। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणार्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणार्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही सांगण्यात आले आहे.
प्रशासनाने दिलेल्या सुचनांनुसार आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. या कालावधीमध्ये आवश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे. घराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तू विजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब रहावे. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. आपले जवळ दैनंदिन लागणारे औषधे, केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात. अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये किमान 3 दिवस पुरतील असे सुखा मेवा/खाद्यपदार्थ जवळ ठेवावेत. सोबत आवश्यक अन्न धान्य पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे. पिण्याचे पाणी शुध्दीकरण करून वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे. अतिवृष्टीबाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. रेडीओसाठी काही जास्त सेल/बॅट-या जवळ ठेवाव्यात. अतिवृष्टी फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र/खाडी किनारी व नदीकिनारी राहणा-या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी. ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा/स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी पाठवतांना एकमेंकांत मिसळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे. मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत/ तहसिलदार कार्यालयास संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र.02141/222097/227452 वर संपर्क साधावा किंवा मो.8275152363 नंबर वर व्हॉटसअॅप करावे असे आवाहन करण्यात आले आहे.