। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
करवीर तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या शिपायास महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या दाखल्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. शिवाजी दत्तात्रय चौगले असे या शिपायाचे नाव आहे. आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सरपंचाच्या सहीचा ना हरकत दाखला जोडणे आवश्यक असते. या दाखल्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायतीत अर्ज दिला होता. हा दाखला देण्यासाठी आरोपीने लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पंच साक्षीदारांच्या समक्ष आंबेवाडी ग्रामपंचायतीचा शिपाई शिवाजी चौगुले याची पडताळणी केली असता, त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश मोरे, हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, कृष्णात पाटील, रुपेश माने या पथकाने केली.