जितेंद्र आव्हाडांची घोषणा
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई शहरात कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची सोय करण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला 100 सदनिका हस्तांतरित करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यानंतर झालेल्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तोडगा काढला आहे. कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घर मिळणार असल्याचं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत झालेला निर्णय रद्द झाल्याने मुख्यमंत्र्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. टाटा रुग्णालयाला आणि तिथे येणार्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 सदनिका हाजी कासम चाळीत देण्यात आल्या होत्या. पण तेथील स्थानिकांनी आक्षेप घेतल्याने आणि त्यांनी तो आक्षेप स्थानिक आमदारांकडे नोंदवल्याने आमदारांनी तो प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.