नारीशक्ती आक्रमक, ठोस कारवाईची मागणी
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे चारफाटा आहे. या चारफाट्यावर कृषी संशोधन, प्रादेशिक केंद्र असून, त्यांच्या व शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले आहे. त्या बांधकामावर कारवाई होण्यासाठी नारीशक्ती संघटनेने मंत्रालय ते शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार केले होते. त्यासंदर्भात कारवाई होण्यासाठी आदेश आले असतानाही कारवाई केली जात नसल्याने अखेर नारीशक्ती संघटनेने मंगळवारी 29 जून रोजी टिळक चौकात उपोषण सुरू केले आहे.
नारीशक्तीचे संघटनेचे ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे या उपोषणाला बसल्या असून अर्चना हगवणे, नीता केरकर, मानसी बार्शी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या. दिवसेंदिवस कर्जत चारफाट्यावर अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये प्रसिद्ध पर्यटन केंद्र माथेरान असल्याने तसेच डॅम, धबधबे, फार्महाउस, किल्ले, लेणी, जंगल परिसरामुळे गिर्यारोहण करण्यासाठी व पाहण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी मुंबई-पुण्यावरून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यात शनिवार व रविवारी या सुटीच्या दिवशी शिण घालविण्यासाठी खास मुक्कामासाठी येतात. त्यामुळे ये-जा करणारे प्रवासी या चारफाट्यावर असणार्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबतात. रस्त्याच्या कडेला हॉटेल, गाळे असल्याने गाडी पार्क करण्यासाठी जागा नाही. तर साहजिकच हॉटेलबाहेर गाड्या रस्त्यावर कसेही गाड्या पार्क करतात आणि इतर वाहनांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने ट्रॅफिकची समस्या निर्माण होते.
लोकप्रतिनिधी रोज याच रस्त्यावरून जात असतात त्यांना समस्या दिसूनही मोबाईलमध्ये लक्ष घालून कानाडोळा करीत आहेत. जर एखाद्या रुग्णाला अचानक अन्य रुग्णालयात हलव्याचे म्हटल्यास या चारफाटा रस्त्यावरून बाहेर निघताना वेळ जातो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगविण्याची शक्यता असते, तर याला जबाबदार कोण असणार?
कारवाईकडे दुर्लक्ष
सदरील बांधकामांवर कारवाई होण्यासाठी आणि ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केले होते. मात्र, आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकवित आहे. त्यामुळे अखेर नारीशक्ती संघटनेने पुढाकर घेऊन जोपर्यंत अतिक्रमण हटविले जाणार नाही, तोपर्यंत उपोषणा माघार घेतले जाणार नाही, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
आतापर्यंत सर्व कार्यालयात पत्रव्यवहार केले आहेत आणि मंत्रालयातून कार्यवाही करण्याचे आदेश दिले असतानाही कोणतीच हालचाल दिसून आलेली नाही.
- स्वीटी बार्शी