पंडित पाटील यांची मागणी,परिसराची पाहणी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मानकुळे बहिरीचा पाडा येथील खारलँड ची कामे जर वेळीच केली नाही तर भविष्यात या गावाचे पुनर्वसन करण्याची नामुष्की शासनावर ओढवेल. तात्काळ नियमांचे अडथळे दूर करून या कामाची पूर्तता करावी अशी मागणी शेकाप नेते माजी आम. पंडित पाटील यांनी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील बहिरीचापाडा गावाला लागून असलेल्या बाहेरील काठयाला उधानाच्या पाण्याने मोठे भगदाड पडले व समुद्राचे पाणी गावात शिरले तसेच लोकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे , हे समजताच पंडित पाटील व रायगड जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
त्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की आपण आमदार असताना सरकार कडून भांडून 11 कोटी मंजूर करून दिले होते. मात्र संबंधित विभाग ज्या गतीने काम करायला हवे त्या गतीने करत नाही असा आक्षेप देखील व्यक्त केला. मानकुळे ग्रामपंचायत हद्दीतील गणेशपट्टी गावचे पुनर्वसन या पूर्वीच केले आहे.
भविष्यात बहिरीचा पाडा गाव पुनर्वसनाच्या उंबरठ्यावर असल्याची भीती देखील पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे. खार बंधीस्तीसाठी आलेला तसेच तात्काळ त्यासाठी निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांनी केली आहे.
यावेळी त्यांच्या सोबत अलिबाग तालुका पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, माजी उपसभापती अनिल पाटील, सिद्धनाथ पाटील, उपसरपंच दीपक पाटील मोठया संघाने बहिरिचापाडा ग्रामस्थ, जगन्नाथ म्हात्रे, सुभाष पाटील, प्रल्हाद पाटील, भालचंद्र पाटील आदी उपस्थित होते.
पंडित पाटील यांनी ताबडतोब अलिबाग तालुका तहसिलदार यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले तसेच तलाठी,सर्कल, विस्तार अधिकारी याना ताबडतोब झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगीतले.