एलएईएस शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
पालकांमध्ये संतापाचे वातावरण
शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी
कर्जत | वार्ताहर |
कर्जतमधील एलएईएस शाळा प्रशासनाने फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षांचे निकालही मुलांना देण्यात आलेले नाहीत. याबाबत शाळा प्रशासनास जाब विचारला असता उडावाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत. पालक फी भरायला तयार आहेत; परंतु त्यांना मुदत हवीय, ती शाळा प्रशासन देण्यास तयार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील एलएइएस या शाळेमध्ये नेरळ तसेच नेरळ परिसरातील मुले शिक्षण घेत आहेत. कोरोना महामारीमुळे वर्षभर शाळा बंद आहेत; परंतु विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण चालू आहे. कोरोना महामारीचा परिणाम सर्वच घटकांवर झालेला आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे पालकही सुटलेले नाहीत. अशा परिस्थितीत काही विद्यार्थ्यांची शालेय फी भरली नाही म्हणून त्यांना एलएइएस प्रशासनाने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे, तसेच काही विद्यार्थ्यांना अजून त्यांचे मागील वर्षांचे निकालही देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
पालकांनी याबाबत विचारणा केल्यास शाळेच्या प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. पालक फी भरण्यास तयार आहेत; परंतु कोरोनासारख्या भीषण परिस्थितीमुळे पालक शाळेच्या प्रशासनाकडे मुदत मागत आहेत. परंतु, पालकांचे म्हणणे प्रशासन ऐकून घेण्यास तयार नाही. म्हणूनच एलएइएस शाळेच्या प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तसेच पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवार, दि. 25 जुलै रोजी आगरी समाज हॉल येथे पालकांची सभा भरविण्यात आली. यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. रंजना धुळे, विलास मसणे, आनंद मोडक, रमेश काळबेरे, केदार खडे, पूनम दळवी, मेघा शाह, विजय ऐनकर, संतोष धुळे, गणेश म्हसे आदी पालक उपस्थित होते.