आधारकार्ड लिंक करण्याची गरज; 78 हजार शेतकर्यांना फटका
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांची माहिती बघता 78 हजार 973 शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित असल्याचे आढळून आले आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक त्रुटींमुळे या योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. बँक अकाऊंटमध्ये अडचणी असणे, आधार कार्ड तपासणी किंवा लिंक नसणे, कर विभागाशी संबंधीत त्रुटींमुळे शेतकर्यांना निधीसाठी वाट पाहावी लागत आहे.
याशिवाय सन्मान निधी योजनेतील निधी शेतकरी योजनेसाठी नोंदणी कधी आणि कोणत्या महिन्यात करतात यावरही अवलंबुन असतो. ज्या शेतकर्यांनी 2019 म्हणजे योजना सुरु झाली तेव्हा नोंदणी केली असेल तर त्यांना पूर्ण निधी मिळतो. मात्र ज्या शेतकर्यांनी 2020 मध्ये नोंदणी केली असेल तर त्यांचा पहिल्या टप्प्यातील निधी त्याचवेळी मोजला जातो. पण पुढील टप्प्यातील निधी मिळायला विलंब होऊ शकतो, कारण त्यांनी नोंदणी करण्यास विलंब केला आहे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रत्यक्षात 2019-20 वर्षापासून हप्त्याची रक्कम आधारबेस माहितीच्या माध्यमातून शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असं सरकारने स्पष्ट केले होते. 2018-19 मध्ये मात्र संबंधित शेतकर्याकडे आधार कार्ड नसेल, तर त्यांच्याकडून पर्यायी ओळखपत्र घेण्यात येतं होतं.
2018-19 मध्ये या योजनेअंतर्गत नाव नोंदवताना गावातील तलाठी/ग्रामसेवक/कृषीसेवक यांनी अर्जदार शेतकर्याची माहिती पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर नोंदवली. पण, आता ही माहिती आधार कार्डवरील माहितीशी जुळत नसल्यामुळे शेतकरी निधीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात 2019 मध्ये 1 लाख 48 हजार 443 शेतकर्यांना योजेनेंंतर्गत 2 हजार रुपयांचा पहिला टप्पा देण्यात आला होता. त्यापैकी 4 हजार 446 शेतकर्यांना अद्यापही दुसरा तर 18 हजार 646 शेतकर्यांना तिसरा टप्पा मिळालेला नाही. तसेच 2020 मध्ये 1 लाख 19 हजार 965 शेतकर्यांना पहिला हप्ता देण्यात आला. त्यापैकी 6 हजार 979 शेतकर्यांना दुसरा तर 13 हजार 573 शेतकर्यांना तिसरा तसेच 2021 मध्ये 94 हजार 912 शेतकर्यांना पहिला टप्पा तर 35 हजार शेतकरी अद्यापही दुसर्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या तीन वर्षांची माहिती बघता 78 हजार 973 शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.