। कर्जत । प्रतिनिधी ।
तालुक्यातील नेरळ-कशेळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणपती चार दिवसांवर आले तरी सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे यंदा गणरायालाही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. कर्जत तालुक्यातील सर्वच रस्ते खड्ड्यांमध्ये हरवले आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काही सोयरसुतक नाही. दरवर्षी साधारणपणे पावसाळा सुरू झाल्यानंतर खड्डे भरायचे काम सुरू होते. गणपतीपर्यंत दोन वेळा खड्डे भरून होतात. यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. खड्डेमय रस्त्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. परंतु बांधकाम विभागाने अजूनही याबाबत कार्यवाही केली नाही. त्यामुळे यावर्षी बाप्पाचा प्रवास खड्ड्यातूनच होणार अशी लक्षणे दिसत आहे.
- यंदा गणेशोत्सव तोंडावर आला तरीही खड्डे भरण्याचे नाव नाही. त्यामुळे भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आंदोलने केल्यावरच बांधकाम विभागाला जाग येणार का?- उदय पाटील, सामाजिक कार्यकर्ते, कशेळे.