। श्रीवर्धन । वार्ताहर ।
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्याने प्रत्येकजण भयभीत झाल्याचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगात पाहवयास मिळाले. जो तो आपापल्या जीवाची काळजी घेऊनच भयभीत झाला असताना आरोग्य विभागातील कर्मचारी, आशाचे कर्मचारी, ग्रामसेवक,आणि तालुका पत्रकार संघ यांनी मात्र आपल्या कुटुंबाची, आपली स्वतःची पर्वा न करता कोरोना सारखे महाभयंकर संकट दूर व्हावे या दृष्टिकोनातून रात्रंदिवस कोरोना रुग्णांच्या सेवेत मग्न होते. कोरोना काळात झोकून घेतलेल्या कर्मचार्यांचा सन्मान होणे अत्यावश्यक होतं, तो सन्मान माझ्या हातून होत असल्याचे खरंखूर समाधान आज मला लाभत आहे असे पालक मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा पंचायत समिती मध्ये आयोजित आरोग्य कर्मचार्यांच्या सत्कार प्रसंगी म्हटले. कर्मचार्यांचे मनापासून कौतुक करताना सांगितले की कोरोनाने संपूर्ण जगाची झोप उडविली, प्रत्येकजण आपला जीव कसा वाचेल या विवंचनेत असताना आरोग्य कर्मचारी मात्र जनतेच्या सेवेत चोवीस तास मग्न होता.त्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची पर्वा न करता जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं होत. कोणत्याही भौतिक सुविधा उपलब्ध नसतानाही त्यांनी निस्वार्थी पणे रुग्णांची सेवा करून फार मोठी सेवा करून अनेकांची कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचविल्याचे कौतुकही पालकमंत्र्यांनी केले. या प्रसंगी जि. प. चे. बबन मनवे,धनश्री पाटील,छाया म्हात्रे,संदिप चाचले, नाजीम हसवारे, मधुकर गायकर, तहसीलदार शरद गोसावी, पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे,प्रशांत गायकवाड, जयश्री कापरे, संतोष सावंत, सतिश शिगवण, चंद्रकांत कापरे आदि मान्यवर उपस्थित होते.