नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत-तालिबान चर्चा झाली असून ‘अफगाणिस्तान भूमीच्या आमच्याविरोधात वापर करू नये,’ अशी भूमिका भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबान्यांसमोर मांडली. दोहा येथील भारतीय दूतावासात दोन्ही प्रतिनिधींची भेट झाली. यावेळी भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या मायदेशात परतण्याच्या मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा झाली.
तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास यांनी मित्तल यांच्याशी चर्चा केली. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारताचे तालिबानशी संबंध कसे असतील? यावर चर्चा होत होती.
गेल्या काही दिवसांपासून जगातील अनेक देशांनी तालिबानसंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली होती. भारत – तालिबान चर्चा झाली असून तालिबानला काही सूचना केल्या आहेत. भारताची भूमिका काय असेल याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. या पार्श्वभूमीवर भारताची चर्चा सध्या चर्चेचा विषय आहे.
अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अल्पसंख्यांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांना सुरक्षित पोहचविले जाईल, असेही सांगितले. अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग हा भारताविरोधात कुठल्याही दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ नये, हा मुद्दाही मित्तल यांनी चर्चेत उपस्थित केला.