। कोलाड । वार्ताहर ।
भिसे ग्रामपंचायत हद्दीतील राजेवाडी गावातील रस्त्याची अवस्था अशीच वर्षानुवर्षे खराब होती. या गावातील तरुणांची संघटना जय हनुमान मित्र मंडळ राजेवाडी हे मंडळ गावाची स्वच्छता व गावाच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असते. त्याचास भाग म्हणून या तरुणांनी गावात रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
रविवारी या मंडळाचे कार्यकर्ते, मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम ठमके यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले व पूर्ण दिवसात गावातील रस्त्यावरिल खड्डे सिमेंट व खडी, वाळू स्व:खर्चाने आणून बुजवले असून यांनी आपल्या गावाशी व समाजाशी असणारी बांधिलकी दाखवली. त्या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम ठमके यांनी सांगितले की, आम्हाला या रस्त्यासंदर्भात फक्त आश्वासन मिळाली होती. परंतु या मंडळाने हा उपक्रम हाती घेऊन तो यशस्वी केला आहे. तसेच त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.