महाराष्ट्रातील किनारपट्टीला विशेषतः कोकण रायगड ठाण्याला पावसाचा कहर हा काही नवीन नाही. याआधीही मुसळधार पावसाने इथल्या रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत केले होते, काही वेळा तर उद्ध्वस्त होण्याइतके ढग बरसले होते. नद्यांना पूर येणे, रस्ते पाण्याखाली जाणे हे या प्रदेशासाठी नवीन नाही. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांत आषाढाच्या धारांनी जो काही हाहाकार निर्माण केला, त्याला सीमा नाही. महाड, पोलादपूर, चिपळूण परिसरात या पावसाने सर्वांत भीषण परिस्थिती निर्माण केली. जमिनीचे अस्तित्वच जणू नजरेपुढून पुसून टाकले. अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या. अनेकजण या पावसाच्या मार्यापुढे तग धरू न शकलेल्या दरडीखाली पुरले गेले. त्यात महाड, पोलादपूर येथील केवनाळे आणि सुतारवाडी येथे ढिगार्याखाली मरण पावलेल्यांची संख्या दुपारपर्यंत 46 वर गेली आहे. अनेक जण जखमी आहेत आणि दरडीखाली अनेकजण अद्याप अडकलेले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागत आहे. पाऊस सुरू असल्याने पाणी ओसरायला विलंब लागत आहे. अद्याप महाडमधील राजेवाडी येथील परिस्थिती गंभीरच आहे. महाडचा मोठा परिसर पाण्याखाली गेल्याने तेथे अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू झाले. तथापि, एकच हेलिकॉप्टर उपलब्ध झाल्याने मदतकार्य धीमे सुरू आहे. त्यात गोवेले येथील साखर बोरज पूल कोसळल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनून मदतकार्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यापुढे वशिष्ठी आणि शिव नदीला पूर येऊन त्याच्या पाण्याने चिपळूण शहराला मगरमिठी मारली आहे. एसटी स्टॅन्डचे, बाजारपेठांचे तलावात रुपांतर झाले. अशाप्रकारे आभाळाने धरतीवर येणे म्हणजे त्या दरम्यानच्या माणसासाठी किती विध्वंसक असू शकते, हे त्या परिसरात राहणार्या लोकांनाच माहिती! आणि पुन्हा येथील भाग वेगवेगळ्या या प्रकारचा. अनेक उंच-सखल, कमजोर आणि मजबूत, डोंगर आणि दर्यांच्या दरम्यानचा. दरड कोसळण्याचे प्रकार देखील घडतात. मात्र आता ज्या तीव्रतेने आभाळ धरतीवर कोसळले आहे, त्याच्यापुढे भल्याभल्या परिसराचा निभाव लागू शकलेला नाही. त्याच्या हाहाकारामुळे लक्षावधी गॅलन पाणी चहूबाजूंनी भरून राहिले आहे. त्यामुळे सगळी वस्तीच दृष्टीआड गेलेली भासत आहे. त्यामुळे शेकडो बैठ्या घरांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे आणि तेथे माणसांना राहणेच अशक्य बनले. असा कहर पाहण्यात आलेला नाही. अनेक लोक पाण्याच्या वेढ्यात अडकून आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी यंत्रणा सतर्क करणे आवश्यक असते. मात्र काही वेळा हे भाग असे दुर्गम असतात की त्या ठिकाणी वेळेत मदत पोहोचणे ही देखील अशक्यप्राय गोष्ट बनते. हा प्रदेश जुलैमधील आषाढाच्या मुसळधार कोसळणार्या धारांपुढे, दर वर्षी तीव्र होत जाणार्या मार्यापुढे हतबल होताना दिसतो. तर त्याचबरोबर या पाण्याच्या मार्गाच्या आड न येण्याचे उपाय शोधण्यातही तो कमी पडतो. कारण या आठवड्या, दोन आठवड्याच्या काळात आलेले हे संकट पावसाचा भर ओसरताच कमी होते आणि मग पुन्हा जीवन सुरळीत करण्याकडे, मोडलेले घर पुन्हा उभारण्याकडे तो वळतो. आणि पुन्हा पुढच्या वर्षाची आपत्ती येईपर्यंत त्याच्याकडे त्यावर कुठला मार्ग नसतो. शहर नियोजन हे आता महानगरापुरते मर्यादित नाही, ते आता छोट्या, निम्न शहरी भागातील छोट्या गावासाठीही आवश्यक आहे. परंतु बेसुमार काँक्रीटचा वापर, मोकळ्या जमिनीवरही पेवरब्लॉक किंवा टाईल्स टाकण्याचा अट्टाहास, अविचारी पद्धतीने केलेली बांधकामे, पाऊसप्रदेशाचा विचार न करता बांधलेले रस्ते, गरज म्हणून धोकादायक भागात निर्माण झालेल्या वस्त्या या सगळ्यामुळे पावसाचे संकट अधिक गहिरे बनते. पावसाचे लोट जाणार कुठे, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. गेल्या दहा-पंधरा वर्षांत देशातील सर्व प्रमुख महानगरे पाण्याखाली गेल्याचे दिसले. मात्र आता छोटी शहरेही पाण्याखाली जायला लागली आहेत. जमीनही जमीन सोडायला लागलेली आहे. या दोन्हीमधील समान कारणे शोधायला हवीत आणि मार्ग काढायला हवा. पाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होणे आणि दरडी कोसळणे यात का, कसे व कोण, या प्रश्नाकडे कोणी पाहत नाही, हे खरे. पाऊस बरसणारच आहे. तो अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे, असे वैज्ञानिक म्हणतात. त्यामुळे आपण त्यातून काय धडा घेतो, हे महत्वाचे. अन्यथा अशा प्रकारच्या संकटांना केवळ नियती, नशीब किंवा दुर्दैव म्हणण्यापलीकडे आपल्या हाती काही उरणार नाही.