मनसे नेते वैभव खेडेकर यांचा आरोप
। चिपळूण । प्रतिनिधी ।
महाविकास आघाडी राज्यातील जनतेला पटलेली नाही. हे काहीतरी वेगळं समिकरण असल्याची जनतेची मानसिकता आहे. कोरोना महामारीची स्थिती हाताळ्यात या सरकारला अपयश आले आहे. असा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केला आहे.
खेडेकर बुधवारी संघटनात्मक कामासाठी शृंगारतळीला आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. कोरोनाच्या काळातील परिस्थिती हाताळताना सरकारला अपयश आले आहे. सरकारमधील कोणतेही मंत्री काम करत नाहीत. राज्यातील प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे याची सरकारला माहिती नाही. वेगवेगळे निर्णय परस्पर घेतले जातात. नंतर बदलले जातात. या कारभारामुळे राज्यातील जनता, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, महिला हे सर्व घटक नाराज आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकांचे प्रश्न कृष्णकुंजवर सोडवले आहेत. कोरोना महामारीत मनसैनिकांनी लोकांच्यात जाऊन अनेक कामे केली आहेत. आजही करत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून राज्यात मनसेमध्ये प्रवेश करणार्या तरुणांची संख्या मोठी आहे.
वैभव खेडेकर,मनसे नेते
एखाद्या कार्यकर्त्यांला संधी मिळाली तर त्याचं सोनं कसं करायचं याचे उत्तम उदाहरण म्हणजे भास्कर जाधव आहे. त्यांची राजकीय कारकीर्द संघर्षाची आहे. अशा अनेक संघर्षांना यशस्वीपणे तोंड देत जाधव यांनी यश प्राप्त केले आहे. ते कोकणचा कोहिनूर आहेत. अल्पावधीसाठी विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतरही त्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे महाविकास आघाडीच्या सरकारला एका वर्षांसाठी अभय मिळाले आहे. त्याची पोचपावती त्यांना मिळेल. महाविकास आघाडी त्यांच्याकडे निश्चितच मोठी जबाबदारी देईल असे मला वाटते.असे त्यांनी सुचित केले.
माजी आमदार संजय कदम यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बळ द्यायला हवे. महाविकास आघाडीच्या सत्तेत त्यांनाही एखादे महामंडळ किंवा तोलामोलाचे पद दिले तर खेड, दापोली, मंडणगड मतदारसंघाबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याला त्याचा फायदा होईल. महामार्गाच्या कामाबाबत आवाज उठवणार पालशेत बाजारपुलाबाबत कोणीही राजकारण करु नये. सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजी करुन हा पुल लवकरात लवकर वहातुकीसाठी खुला करावा. विजापुर महामार्गाच्या कामाबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत. आजपर्यंत अनेक निवेदने आम्ही दिली आहेत.पक्ष वाढीसाठी आवश्यक ते बळ देण्याचे काम आम्ही करत आहोत. यावेळी मनसेचे संदीप फडकले,विनोद जानवळकर, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.