रुग्णसेवा करणार्या डॉक्टर, नर्स कर्मचारी यांच्यावर प्रचंड ताण
तरी देखील झालेल्या आरोपांमुळे संतापाचे वातावरण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टर्स, अधिसेविका, सहायक अधिसेविका, आरोग्य परिचारीका, क्लिनिकल उन्स्ट्रक्टर, सिस्टर टयुटर, असे अनेक पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवर प्रचंड ताण आहे. 89 मंजूर पदापैकी 41 पदे रिक्त आहेत. तरीदेखील रजा न घेता हे कर्मचारी सेवाभावी वृत्तीने काम करीत आहे. असे असतानाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्या विधानामुळे सर्व कर्मचारी दुखावले गेले असून त्यांच्यामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. डॉ सुहास माने यांच्या या कार्यपद्धतीविरोधात शासनाकडे तक्रार करण्याच्या तयारीत कर्मचारी असल्याचे त्यांच्या प्रतिनिधींच्या वतीने सांगण्यात आले. तसेच वेळ पडल्यास काम बंद करण्याचा इशाराही दिला जात आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्या कारभाराचे वाभाडे कृषीवलने काढण्यास सुरुवात केल्यानंतर पायाखालील वाळू सरकलेल्या डॉ माने यांनी गौप्यस्फोट करीत याला कर्मचारी खोटया कारणाने रजा घेत असल्याने त्या दरम्यान मृत्यू दर वाढल्याचे सांगितले. याप्रकारामुळे संपूर्ण जिल्हा रुग्णालयात संतापाचे वातारवरण पसरले आहे. आधिच जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्या भरण्याचे सोडून अर्थपूर्ण कारणांसाठी रखडवलेल्या आहेत. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवर मोठया प्रमाणावर ताण आहे. वैद्यकिय अधिकारी वर्ग 1 ची 19 मंजूर पदांपैकी 4 पदे भरण्यात आलेली आहेत. तर 15 पदे रिक्त आहेत. क्ष किरण तज्ज्ञ 2, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1, औषधनिर्माता 3, स्वच्छता निरीक्षक 1, वार्डन 4, अॅक्सपेशनल थेरापिस्ट 1, शस्त्रक्रिया सहायक वर्ग 3 चे 1, प्रयोगशाळा सहाकय 1 तर नेत्रचिकित्सा सहायक 3, परिसेवीका 1 बालरुग्णपरिचारीका 1, मनोविकृती परिचारीका 2, शुश्रुषा संवर्गातील 238 पैकी 19 पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवर प्रचंड ताण आहेत. त्यांना रजा मिळत नाहीत. वैद्यकिय कारणास्तव रजा मिळत आहे. असे असतानाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार कोणालाही किरकोळ, अर्जित रजा न देण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही बरेच आरोग्य कर्मचारी मुद्दाम खोटे कारण सांगून वैद्यकिय अर्जित रजेवर जात असल्याचे आरोप केल्यामुळे सर्वच कर्मचारी अधिकारी दुखावले गेले आहेत.
प्रामाणिकपणे सेवा करुन देखील जर अशा पद्धतीचे आरोप करण्यात येत असतील तर ते चुकीचे आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी आपले विधान मागे घेऊन माफी मागितली नाही तर आम्हाला शासनाकडे तक्रार करावी लागेल. तसेच वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही कर्मचार्यांनी दिला आहे.