सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षबांधणीबाबत चर्चा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पक्षबांधणीच्या कामाचे नियोजन तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनाची आखणी करणे आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती बैठकीचे सांगोला येथे आयोजन करण्यात आले आहे. शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सांगोला जिल्हा सोलापूर याठिकाणी शनिवार दि.25 आणि रविवार दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसोबत माहिती देताना कार्यालयीच चिटणीस डॉ राजेंद्र कोरडे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार प्रागतिक पक्षांना विचारात न घेता कारभार करीत आहे. केद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांबाबत या सरकारची भूमिका शेतकरी आंदोलनाचा विश्वासघात करणारी आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील केला असतानाच, स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने धोक्यात आले आहे. निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते वादळ तसेच मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांचे विशेषतः किनारपट्टीवरील कोकणातील जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे. या संकटात जनतेला आवश्यक मदत करणेकामी हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. कोरोना हाताळणीतील हलगर्जी आणि अक्षम्य धोरण-लकव्यामुळे हजारो निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बेरोजगारी-महागाईने सर्वसामान्य जनतेचे जीणे मुश्कील केले आहे. जनतेच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांकडे लक्ष देणे सोडून केंद्र व राज्य सरकारातील सत्ताधीश सूडप्रतिसूडाचे राजकारण करीत आहेत. या सर्व परिस्थितीत डावे लोकशाहीवादी प्रागतिक पक्षाची जबाबदारी वाढली आहे. दलित-श्रमिक जनतेचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी या प्रागतिक पक्षाची एकजूट आवश्यक असून, शेतकरी कामगार पक्षाने याकामी पुढाकार घेतला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे राजकारण घडवण्यासाठी पक्षबांधणी ही आवश्यक बाब असून, जिल्हा-तालुका-गांव पातळीवर पक्षाचे संघटन उभारणे गरजेचे आहे, युवा, विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार या प्रमुख जनआघाडयांसह इतरही आवश्यक जनआघाडया स्थापन करून त्या क्रियाशील करणे ही काळाची गरज आहे. पक्षबांधणीच्या कामाचे नियोजन करणे तसेच तातडीने करावयाच्या आंदोलनाची आखणी करणे हे या बैठकीसमोरील मुख्य उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच सांगोला जिल्हा सोलापूर याठिकाणी शनिवार दि.25 आणि रविवार दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी होणार्या मध्यवर्ती समिती बैठकीचा प्रमुख मुद्दा पक्षबांधणी राहणार आहे.
गांवपातळीपासून पक्षसंघटना बांधणी हे आपले उद्दिष्ट असून, प्रथमतः महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात पक्षाची जिल्हा समिती गठीत करून कार्यरत करणे हे पहिले काम आहे. आजमितीस ज्या जिल्हयात जिल्हा समिती कार्यरत आहे, त्याठिकाणी तालुका स्तरीय समित्यांची स्थापना करणे आवश्यक असून, प्रत्येक जिल्हा चिटणीसांनी बैठकीला येतेसमयी आप-आपल्या जिल्हयातील पक्षसंघटनेचा विस्तृत अहवाल सोबत घेवून यावे, अशी सूचना आहे. नवीनठिकाणी पक्षबांधणीबाबतीत काही प्रस्ताव व सूचना असल्यास चर्चेत तशी मांडणी व्हावी, अशी अपेक्षा आहे. जनआघाडया हा पक्ष बांधणीतील मैलाचा दगड असून, आजमितीस या जनआघाडयांकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. यापुढील काळातील तातडीचे आणि महत्त्वाचे काम हे या जनआघाडयांच्या उभारणीचे आहे. जनआघाडयांचे बाबतीत आपल्या काही सूचना वा प्रस्ताव असतील तर ते या बैठकीपूर्वी मध्यवर्ती कार्यालयात पोहचतील या बेताने पाठवाव्यात. या बैठकीत जनआघाडयांचे बाबतीत चर्चा होवून, काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.
जनतेच्या प्रश्नांवरील चळवळीच्या अभावी जनतेत नैराश्याची भावना आहे. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर लढे उभारण्याची व जनतेतील असंतोष पेटवण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने आगामी काळात आखावयाच्या मोहीमा आणि आदोलने याबाबतही या बैठकीत आपणांस चर्चा करावयाची असून, आप-आपल्या भागातील परिस्थिती व त्याठिकाणी होवू शकणारे लढे याबाबतही मध्यवर्ती समिती सदस्यांनी काही-एक मांडणी करावी, अशी अपेक्षा आहे. बैठकीत येतेसमयी याबाबतीत तयारीने यावे, अशी सूचना आहे. पूणे येथील बैठकीत घेतलेल्या अनेक निर्णयांवर नंतरचे कोरोना काळात, अमंलबजावणी होवू शकलेली नाही, पूणे बैठकीचे निर्णय, तसेच सद्य:परिस्थितीतील नवीन आव्हानाचा सामना करणेकरिता घ्यावयाचे आवश्यक निर्णय या दोन्हींवर यापुढील काळात आपणांस काम करावयाचे आहे. सदरची मध्यवर्ती समिती बैठक ही अतिशय महत्त्वाची असून आपण त्यात गांभीर्यपूर्वक भागीदारी करणेच्या तयारीने यावे, असे आवाहन कार्यालयीन चिटणीस अॅड.राजेंद्र कोरडे यांनी केले आहे.
मध्यवर्ती समितीचे बैठकीचे ठिकाण हर्षदा लॉन्स, मिरज रोड, सांगोला, जिल्हा-सोलापूर असे आहे. यासंदर्भात काही अडचण वा विचारणा करणे आवश्यक असल्यास मध्यवर्ती समिती बैठकीचे प्रमुख व्यवस्थापक दत्तात्रय वाघमारे यांचेशी त्यांच्या मो. नं.9764351761 वर संपर्क साधावा. तसेच काही विशेष अडचणीकरिता आवश्यक असल्यास बाबासाहेब कारंडे, 8888666464, बाळासाहेब काटकर 9011145555, दादासाहेब बाबर 9975994243, गजेंद्र कोळेकर 9764920981, नानासाहेब लिगाडे 7218180001 यांचेशी संपर्क साधता येवू शकतो.