आगामी अधिवेशनात मोदी यांच्याकडे आग्रह धरणार, भुमीपुत्र मेळाव्यात ग्वाही
जेएनपीटी । वार्ताहर ।
नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी येत्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह करणार असल्याचे ठोस आश्वासन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जासई-उरण येथे आयोजित करण्यात आलेल्या भुमीपुत्रांच्या मेळाव्यातून दिले.भुमीपुत्रांनी सुरू केलेल्या संघर्षमय लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शवित राज्य सरकारची भूमिका बदलल्याशिवाय आता मागे हटणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी या मेळाव्यातून दिली.
भुमीपुत्रांच्या मेळाव्यात बोलताना राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नवीमुंबई विमानतळाला दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावासाठी भुमीपुत्रांनी सुरू केलेल्या संघर्षाची झोपी गेलेल्या महाआघाडी सरकारने दखल घ्यावी असे आवाहन केले. भुमीपुत्रांच्या भावनांचा आदर करावा.अन्यथा भुमीपुत्र दिबांच्या नावासाठी रस्त्यावर उतरेल असा इशाराही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उरण येथे आयोजित करण्यात आलेल्या भुमीपुत्रांच्या मेळाव्यातून दिला.
विमानतळाच्या नामकरणासाठी 2015 साली मी आगरी समाजाचा खासदार असताना दिबांच्या नावाची सर्व प्रथम मागणी केली होती.आता दिबांच्या नावासाठी भुमीपुत्र, कार्यकर्त्यां पेटून उठला आहे.दिबांच्या नावाला ज्यांची सहमती तोच खरा भुमीपुत्र. त्यामुळे दिबांच्या नावासाठी यापुढे सर्वांनाच सोबत यावेच लागेल.दिबा हे आगळेवेगळे नेतृत्व होते.त्याच्या नावासाठीच संघर्ष सुरू झाला आहे.यापुढे प्रत्येक भुमीपुत्र दिबा बनुनच काम करेल, रस्त्यावर उतरेल आणि संघर्ष करेल अशी अपेक्षाही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली.
भुमीपुत्राच्या मेळाव्याआधी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी लोकनेते दिबा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर दिबा पाटील सभागृहात मेळाव्यात मार्गदर्शन केले.याप्रसंगी विधिमंडळ पक्षनेते प्रवीण दरेकर, बाळासाहेब पाटील, सायली म्हात्रे,जगदिश गायकवाड, रवि भोईर, कौशिक शहा, चंद्रकांत घरत, सुधिर घरत,संतोष घरत, निळकंठ घरत, महेश कडू, जितेंद्र पाटील,दिपक भोईर, सुरेश पाटील, जितेंद्र घरत, इतर मान्यवर उपस्थित होते.