वाड्यांवर स्मार्टफोन, इंटरनेटचे विघ्न
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद त्यामुळे यंदाही ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. मात्र स्मार्टफोनचा अभाव आणि इंटरनेटचा व्यत्यय यामुळे ऑनलाईन शिक्षण ग्रामीण, दुर्गम, आदिवासी वाडी व वस्तीवरील मुलांपर्यंत पोहचणे दुरापास्त झाले आहे. परिणामी कोणी स्मार्टफोन देते का स्मार्टफोन असे बोलण्याची वेळ पालक व शिक्षकांवर आली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी व पालक यांच्याकडे स्मार्टफोन नसल्याने विद्यार्थी ज्ञानकण गिरवणार कुठे हा प्रश्न भेडसावत आहे. मागील वर्षी भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यात असे आढळून आले की, विद्यार्थ्यांच्या वर्गाच्या तुलनेत ऑनलाईन तासात सहभाग हा 56 टक्के असमाधानकारक तर शिक्षकांचे ऑनलाईन शिकवण्याचा अनुभव हा 74 टक्के असमाधानी आला आहे. त्यात स्मार्टफोन व इंटरनेटचा अभाव, त्यामुळे शिक्षकांना ऑनलाईन व ऑफलाइन या दोन्ही मार्गाने जावे लागत आहे असे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र आंबिके यांनी सांगितले.
स्मार्टफोन ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. काही दुर्गम व डोंगराळ भागात इंटरनेट व मोबाईल नेटवर्क नसल्यामुळेही ऑनलाईन शिक्षणात अडथळे येत आहेत. कोरोनामुळे शाळेतील प्रत्यक्षात बंद असलेले अध्ययन, अध्यापन व ऑनलाईन शिक्षणातील अडथळ्यांची शर्यत यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परवड होत आहे. कोरोना काळात रोजगार नसल्यामुळे ग्रामीण भागातील पालक महागडा स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा आपल्या मुलांना उपलब्ध करुन देऊ शकत नाहीत . त्यामुळेच ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांसमोर ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे असा प्रश्न पडला आहे.
स्मार्ट फोन आणि इंटरनेट नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत आहेत. परिणामी अध्ययन-अध्यापनाचे व्हिडीओ किंवा लिंक तरी विद्यार्थ्यांना कसे पाठवणार. फक्त मोबाईलवर अवलंबून राहिल्यास अशा मुलांचा अभ्यास कसा होणार. त्यामुळे शक्य आहे त्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका देखील देणार आहोत.
सरिता सावंत, मुख्याध्यापिका, आश्रमशाळा, वावळोली.
या संदर्भात यंदा अजून कोणत्या नवीन मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. मात्र कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच यंदा देखील विद्यार्थ्यांचे शिकणे ऑनलाइन सुरू आहे. शाळा बंद पण शिकणे सुरू हा उपक्रम राबविला जात आहे. इयत्ता पहिली ते नववी च्या शिक्षकांची शाळांमध्ये उपस्थिती 50 टक्के आहे. आणि 10 व 12 वीच्या शिक्षकांची उपस्थिती 100 टक्के आहे.
कल्पना काकडे, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, रायगड.