शोधीशी मानवा राऊळी मंदिरी!
नांदतो देव हा आपल्या अंतरी!!
मंदिरे उघडा ही मागणी अपेक्षेप्रमाणे भाजपच्या मंडळींनी आणि मुख्यत्वे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंनी केल्यापासून मला त्यांच्या वडिलांनी स्वरबद्ध केलेलं आणि महंमद रफी यांनी गायिलेलं हे गीत सतत आठवतंय. वंदना विटणकर यांनी लिहिलेल्या या गीताच्या पहिल्या दोन ओळीत सध्याच्या ‘मंदिरे उघडा’ या मागणीच उत्तर सामावलेलं आहे. बरं! हे केवळ हिंदू धर्मीयांकरता लागू आहे असं समजण्याच कारण नाही. कवयित्रीनी ‘मानवा’ हा शब्द लिहून हे गित सर्व धर्मियांना लागू केलेलं आहे. नाहीतर हिंदुत्ववादी केवळ मंदिरे का बंद ठेवायची हा प्रश्न विचारायला सरसावतील. पण मानवा या शब्दामुळे आणि महंमद रफी यांनी गायिल्यामुळे यांचंही उत्तर मिळत. ज्यांच्या नावाने आज नागपूर विद्यापीठ आहे अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी हीच भावना या तीन ओळीत व्यक्त केली आहे.
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
देव अशान, भेटायचा नाही हो।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो
पण संत महात्म्यांनी इतकं सांगूनसुद्धा दुर्दैवाने मंदिराचा आग्रह धरणारे काही विशिष्ट लोक या देशात आणि या राज्यात आहेत. यांच्या दृष्टीने मंदिर शांतीकरता नसून आपलं राजकीय उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी असतो. 6 डिसेंबर 1992 रोजी याच लोकांनी मंदिराच्या आग्रहासाठी बाबरी मस्जिद पाडून सुमारे 10000 लोकांचा बळी देऊन आत्तापर्यंत चार वेळा केंद्रात सत्ता मिळवली आणि आता लोकसभेत यांचं बहुमत आहे. आज सर्व जग गर्दी टाळून कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याचा प्रयत्न करत असताना या हिंदुत्ववादी भाजपला मात्र राज्यातील सर्वांचं लसीकरण होण्यापेक्षा मंदिर उघडणे जास्त महत्त्वाचं. कारण ’मंदिर’ हाच शब्द त्यांचा तारणहार. मात्र आपला राजकीय स्वार्थ लपविण्यासाठी हा हिंदुत्ववादी पक्ष मंदिर उघडणे हे पुजारी आणि मंदिराभोवती उपजीविका करणार्या अनेक व्यावसायिकांच्या दृष्टीने कस आवश्यक आहे हे आर्थिक दृष्ट्या समजावून सांगण्याचा प्रयत्नही हा पक्ष आणि त्याचे हिंदुत्ववादी पाठीराखे करत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांवर गदा आली आहे. त्यात धार्मिक स्थळंही सुटली नाहीत. असे तर सगळ्या लोकांचे हाल झालेत. अनेक पत्रकारांना नोकर्या नाहीत आहेत त्यांचे पगार कापले गेलेत. शिकवणी वर्ग घेणारे घरी आहेत. कपड्याच्या दुकांनाना पाहिले की कळते की दहा माणसे कपडे दाखवायला आहेत आणि गिर्हाईक दोन नाहीत. त्यांना दुकान सुरू ठेवण्यासाठी उत्पन्नाहुन जास्त खर्च येतो.
देव भावाचा भुकेला आहे अस म्हटलच आहे. तो भाव भक्ती आपण घरी बसूनही करू शकतो. भाजप तर मंदिर उघड म्हणणारच! कारण ते त्याच्याच भरवशावर जगत आहेत. पण आता मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरल्यानंतर मनसेला एकट्या पडलेल्या भाजपचा हात धरण क्रमप्राप्त ठरणार. जसे राणे आले तसे राज! कारण या दोघांचाही दुष्मन एकच -उद्धव ठाकरे. लोकं मंदिर उघडण्याचा मार्केट उघडण्याशी संबंध जोडतात तेव्हा मला त्या लोकांची कीव करावीशी वाटते. जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी मार्केट आवश्यक आहे. मंदिरे भावनिक मुद्दा वगळला तर कशासाठी आवश्यक मानावी? बरे! आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक देव देवतांचे फोटो, लाईव्ह रेकॉर्डिंग याद्वारे भक्त सर्व देवतांचे दर्शन घेऊ शकतात. मग राऊळी मंदिरी जाण्याचा अट्टाहास का? राजकीय गरजेनुसार असेल किंवा मूळ त्याच पठडीतील असल्यामुळे असेल पण राज यांनी मंदिर उघडण्याचा मार्ग चोखाळला. ’नांदतो देव हा आपल्या अंतरी’, हे त्यांच्या लक्षात नक्कीच असेल ही अपेक्षा! असो!
महाराष्ट्रात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद आहेत. तसेच भाजपाशासीत राज्यांतील मंदिरे बंद असूनही तिथे कुणी विरोधकांनी ‘मंदिरे उघडा’ आंदोलन केलेले नाही.
मात्र, कोरोनाच्या प्रत्येक लाटेत राज्यातल्या विरोधकांचे ’मंदिरे उघडा’ आंदोलन ठरलेले आहे. गेल्या वर्षी आणि यावर्षीही हेच आंदोलन. आणि दुर्दैवाने त्यात अण्णा हजारे राज ठाकरे पण समिल झाले आहेत.
प्रतिबंधात्मक धार्मिक स्थळांबाबत दिलेले आदेश केवळ मंदिराबाबत नसून, सर्व धार्मिक व पूजेची स्थळे आणि प्रार्थनागृहे त्यात समाविष्ट आहेत. केंद्रातील भाजपा सरकारने दिलेल्या निर्देशात सर्व धार्मिक स्थळे प्रार्थनागृहे बंद ठेवण्याबाबत सूचना आहेत. ही धार्मिक स्थळे बंद आहेत. तसेच सर्व सण सुद्धा कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सर्व सण साजरे करावे या सूचना आहेत.’मंदिरे उघडा’ हे आंदोलन सर्वसामान्य हिंदू जनतेचे नाही. राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या भाजपच्या नेहमीच्या धार्मिक अपप्रचाराचा तो परिणाम आहे. भाजप आध्यात्मिक आघाडी, स्वतः भाजप, अण्णा हजारे ते राज ठाकरे जी एकच गोष्ट सातत्याने बोलत आहेत, तो कांगावा आहे, असं वाटतं.
वात्स्यायनाला कामसूत्राच जनक मानलं जातं. त्याच्या पुस्तकात 64 आसनांचा उल्लेख आहे. या सर्व सर्व आसनांचा भिंतीत कोरलेला उल्लेख आपल्याला खजुराहो,अजंठा, वेरूळ आणि एलिफंटा च्या गुहेत दिसत. आता ही सर्व शिल्प संस्कृतीच्या नावाखाली तोडायची का? मग या लोकात आणि बामियाँन बुद्धाची मूर्ती तोफेच्या गोळ्यांनी उडवणार्या तालिबान मध्ये फरक तो काय?ते मुस्लिम तालिबानी (तालिबान या शब्दाचा अर्थ विद्यार्थी). तर हे हिंदू तालिबानी एवढंच काय तो फरक. ते मुलींनी बुरखा घालण्याचं फर्मान सोडतात आणि एकत्र शिक्षण पद्धती बंद करतात तर हे हे जगाला कामसूत्र शिकविणार्या वात्स्यायनाच्या देशात त्याची पुस्तके जाळतात, मुलींनी नाईट क्लबमध्ये जाऊ नये, मोबाईल वापरू नये मिनी स्कर्ट घालू नये अशा प्रकारचे स्वतः चे तथाकथित नियम लावतात . दोघांचीही जातकुळी सारखीच. या तथाकथित संस्कृती रक्षक लोकांना देशातही स्त्रियांवर बंधने असावीत अस वाटत.मोबाईलमुळे मुली बिघडतात असा जावईशोध लावणारे काही नेते पक्षात आहेत. या लोकांना स्त्रियांवर बंधन आणण्याची इच्छा आहे. कामसूत्र या पुस्तकाची होळी करणारे हे बजरंग दलाचे कार्यकर्ते हिंदू तालिबानीच आहेच. याना वेळेवर रोखलं नाही तर हा बजरंग दलाचा भस्मासुर भारतातही हिंदू तालिबानी प्रवृत्ती सुरू करेल. ते होऊ नये याची सर्वांनीच काळजी घ्यावी. तूर्तास इतकेच!