प्रशासनचे मात्र दुर्लक्ष
सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील अनेक रस्ते, पुलांची दयनीय अवस्था झाली असून, वर्षानुवर्षे या रस्त्यांची साधी डागडुजीसुद्धा झालेली नाही. स्थानिक प्रशासनाला व लोक प्रतिनिधींना या भयानक वास्तव्याची जाणीव असूनदेखील याबाबत त्यांच्याकडून काहीही उपाय किंवा तजवीज होताना दिसत नाही, अशी खंत सुधागडवासियांकडून व्यक्त होत आहे.
सुधागड हा तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात जवळपास 100 महसुली गावे आहेत. तसेच साडे तीनशे पेक्षा अधिक आदिवासी व ठाकुरवाड्या असून, त्या दुर्गम भागात तसेच डोंगरावर वसलेल्या आहेत. यातील काही गावे व वाड्यांपर्यंत कच्चा रस्ता किंवा पायवाटच जाते, तीही स्थानिकांनीच तयार केलेली आहे.
सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर (खुर्द), चेरफळवाडी, शिरसेवाडी, करंजाई यासह अनेक ठाकूरवाड्या, तसेच मढाळी, शिळोशी, पावसाळावाडी, दांडवाडी, गाठेमाळ, मुळशी, डुबेवाडी, दर्यागाव, चिवे, ढोकळेवाडी असे बहुसंख्य आदिवासी व कातकर वाड्या, कणी, गौळमाळ, गोगुळवाडा, गोकुळवाडा, कोंडी असे कित्येक धनगरवाडे सोबत गोमाशी, दिघेवाडी, खांडसई, घोटवडे, शिळोशी, मढाळी, कामथेकरवाडी, आसरे, नवघर, धोंडसे, वाघोशी, वांद्रोशी, पाच्छापूर, कोंडगाव, फणसवाडी, कोशिंबळे आदी असंख्य गावांना जाणार्या मार्गाची देखील पुरती दुरवस्था झाली आहे. येथील रस्त्यांवर अक्षरशः मोठाले खड्डे पडले आहेत. खडी आणि माती बाहेर आली आहे. तर काही रस्त्यांची कित्येक वर्षे साधी दुरुस्ती देखील झालेली नाही. असा खडतर आणि खाचखळग्यांच्या रस्त्यावरून नागरिक, वृद्ध, रुग्ण व महिला प्रवास करतात. कधीतरी शासनाला जाग येऊन ते रस्ता करतील किंवा डागडुजी करतील या भोळ्या आशेवर येथील लोक जगत आहेत.
पूल धोकादायक
सुधागड तालुक्यातील घोटवडे गावाकडे जाणारा पूल खचला आहे. तसेच नांदगाव, नेनवली, पिंपळोली, मढाळी, शिळोशी, आवंढे, भेरव, पेडली, मुळशी, वासुंडे अशा बहुतांश पुलांना कठडेदेखील नाहीत. त्यामुळे तेथून प्रवास करणे धोकादायक आहे. वाकण-पाली-खोपोली मार्गावर पाली, जांभुळपाडा व भालगुल येथील पूल देखील धोकादायक झाले असून, त्यावरून क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक होते आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. पावसाळ्यात पाली आणि जांभुळपाडा पुलारील संरक्षक कठडेदेखील तुटले आहेत. रस्ता व पुलांची कामे झाल्यास या सर्वांची होणारे परवड थांबेल.