पनवेल | वार्ताहर |
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 15 मध्ये असणार्या स्मशानभूमीची पुरती दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी असणार्या बैठक व्यवस्थेमध्ये पूर्णतः पाणी झिरपत असून, येथील स्लॅब पाणी झिरपून निकामी झाला आहे. तो केव्हाही जमीनदोस्त होऊ शकतो व मोठा अपघात घडून जीवितहानी होऊ शकते.
याठिकाणी ठेवण्यात आलेली लाकडे पूर्णतः भिजली असून, त्याचा फटका अंत्यविधी करणार्या नागरिकांना बसत आहे. याबाबत सिडको व महापालिका या दोन्ही प्रशासनाकडे माहिती विचारली असता, दोन्ही प्रशासन एकमेकांवर टोलवाटोलवी करीत असल्याचा आरोप येथे येणार्या नागरिकांनी केला आहे. पाणी झिरपत असल्यामुळे भिजलेल्या लाकडाने अंत्यविधी करायचा कसा, असा यक्षप्रश्न अंत्यविधीला गेलेल्या नागरिकांसमोर उभा राहात आहे. मात्र याचे सोयरसुतक ना सिडकोला आहे, ना महापालिकेला आहे.
महापालिका निर्माण झाल्यानंतर कोणकोणत्या सेवा महापालिकेकडे सिडकोने हस्तांतरित केलेल्या आहेत. या संभ्रमावस्थेत येथील नागरिक असून, सेवा दिली जात नाही, मात्र मालमत्ता कर सक्तीने वसूल केला जातो, याबद्दलही नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. समस्याने वेढलेल्या स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी कळंबोलीवासिय करीत आहेत.