नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात सलग दुसर्या दिवशी 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 39,097 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 546 कोरोनाबाधितांनी जीव गमावला आहे. यापूर्वी शुक्रवारी 35,342 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 35,087 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 23 जुलैपर्यंत देशभरात 42 कोटी 78 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 42 लाख 67 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 45 कोटी 45 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 16.31 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून कमी आहे.