गावकर्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील अनेक गावे, वाड्या वस्त्यात बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर अवलंबून राहावे लागते. अनेक पिढ्यांची तहान विहीर भागवत असते. मात्र विहिरच कोलमडून पडली तर ग्रामस्थांपुढे मोठे पाणीटंचाईचे संकट ओढवते. कोंडगाव येथील विहीर सोमवारी (ता.28) पहाटे पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे गावकर्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.
ही विहीर बांधून 10-12 वर्षे झाली आहेत. गावातील लोक पिण्यासाठी याच विहिरीच्या पाण्याचा वापर करतात. पिण्याच्या पाण्यासाठी गावकर्यांकडे दुसरे कोणतेही साधन नाही. आता अचानकपणे विहीर ढासळल्याने गावकर्यांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. या विहिरीत मातीचे ढिगारे कोसळल्याने पाणी देखील गढूळ झाले आहे. विहीर पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे, तर प्रशासनाला याकामी पूर्ण सहकार्य राहील असे यावेळी ग्रामस्थांनी म्हटले.
त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर ही विहीर दुरुस्त करावी असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत ग्रामस्थांनी फोनवर संपर्क केले असता पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार हे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी येणार असून लवकरच योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.