मुंबई | प्रतिनिधी |
भारत सरकारने लागू केलेल्या नव्या माहिती आणि तंत्रज्ञान कायदा म्हणजे आयटी अॅक्टमुळे यूजर्सची सुरक्षा आणि खासगीपण धोक्यात आल्याचं व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ट यांनी म्हटलंय. जगातले इतरही देश भारताच्या या नियमांचे अनुकरण करण्याची शक्यता असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. विल कॅथकाक्ट यांनी द व्हर्ज नावाच्या माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, नव्या कायद्यानुसार, केंद्र सरकारला एखाद्या आक्षेपार्ह वाटणार्या गोष्टीबद्दल माहिती हवी असल्यास तशी मागणी ते सोशल मीडिया कंपनीकडे करु शकतात. एखाद्या चॅटचा किंवा मेसेजचा मूळ स्त्रोत कोण आहे, किंवा कोणी त्याची निर्मिती केली ही माहिती जर सरकारने व्हॉट्स अॅपकडे मागितली तर ती द्यावी लागेल. त्यामुळे एन्ड टू एन्ड एनक्रिप्शनच्या नियमाचे उल्लंघन होण्याची शक्यता असून यूजर्सची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे.