। चिपळूण । वार्ताहर ।
चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची मुंबईत भेट घेतली आणि पूरग्रस्तांच्या समस्या मांडून तातडीने उपाययोजना करण्याचे निवेदन दिले. यासमयी, पूररेषेसंदर्भात कोणताही चुकीचा निर्णय होऊन पूरग्रस्त चिपळूणवर अन्याय होऊन देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कातकर, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य गुलजार कुरवले, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले आदी उपस्थित होते.
चिपळूण शहरासाठी निळी व लाल पूररेषा निश्चित करण्याचे काम सुरू झाले होते. मात्र सध्या या पुररेषा निश्चितीच्या कामाला तत्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती तत्पुरती असली, तरी भविष्यात याबाबत फेरविचार करताना चिपळूणच्या विकासाला बाधा पोहचवणारा, इथल्या नागरिकांवर अन्याय करणारा निर्णय घेतला जाऊ नये, अशी मागणी यावेळी यादव यांनी पटोले यांच्याकडे केली. यावर आपण वैयक्तिक पातळीवर लक्ष देउ तसेच यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून भविष्यात योग्य निर्णय घेण्याच्या सूचना देऊ, असे पटोले म्हणाले.
प्रशांत यादव यांनी दिलेल्या निवेदनात नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळाबाबतही लक्ष वेधले. वाशिष्ठी आणि शिवनदीत साचलेला गाळ काढून दोन्ही नद्यांचे खोलीकरण केल्यास चिपळूणमधील पुराची तीव्रता कमी होईल. तसेच इतर योग्य पद्धतीने सर्वेक्षण करून विविध समस्यांवर ठोस उपाययोजना केल्या जाव्यात तसेच नागरिक, व्यापारी यांना विश्वासात घेऊनच संबधित निर्णय घेतला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.