। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
महंत नरेंद्रगिरींच्या मृत्यूप्रकरणी खरा अपराधी कोण? याप्रश्नाचे उत्तर आजही अनुत्तरीतच आहे. पण आता महंत नरेंद्रगिरींच्या मृत्यूपत्रातील काही तपशीलांवरून मात्र त्यांच्या मृत्यूचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महंतांनी एक नव्हे तर तीन वेळा आपली मृत्यूपत्रे तयार केली होती. पण गेल्या 10 वर्षांत तीन वेळा मृत्यूपत्र बदलण्याची वेळ महंतांवर का आली असावी, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. त्यातही प्रत्येक वेळी महंतांनी त्यांच्या मृत्यूपत्रात आपला उत्तराधिकारी कोण असावा, याचे तपशील बदलल्याचे आढळल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 7 जानेवारी 2010 तयार करण्यात आलेल्या मृत्यत्रात उत्तराधिकारी म्हणून बलवीरगिरी तर 29 ऑगस्ट 2011 च्या दुसर्या मृत्यत्रात उत्तराधिकारी म्हणून आनंद गिरींना उत्तराधिकारी ठरवण्यात आले आहे. 2 जून 2020 मध्ये तयार करण्यात आलेल्या मृत्यत्रात उत्तराधिकारी म्हणून पुन्हा एकदा बलवीरगिरींचे नाव आहे. महंतांच्या सुसाईट नोटमध्ये बलवंत गिरींनाच उत्तराधिकारी करावे, असे लिहिल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही सुसाईड नोट इतर कुणी लिहिल्याचा पोलिसांना संशय आहे. या मृत्यूपत्रातून पोलिसांना काही नवे धागेदोरे मिळतात का, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.