। पंढरपूर । प्रतिनिधी ।
कोरोनाचा राज्यातील वाढता कहर लक्षात घेता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने 17 मार्च पासून केवळ पंधराशे भाविकांनाच दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी जेव्हा कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव सुरु झाला तेंव्हा दक्षता म्हणून श्री विठठल रुक्मिणी मंदिर 17 मार्च 2020 पासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर तब्बल आठ महिन्यानंतर 15 नोव्हेंबरपासून शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात भाविकांना मुखदर्शनासाठी प्रवेश देणे सुरू करण्यात आले होते.निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांनी कळवल्यानुसार काही दिवसांपासून ऑनलाईन बुकींग करुन आलेल्या तीन हजार भाविकांना दर दिवशी मंदिरात प्रवेश देण्याचे ठरवण्यात आले होते, परंतु राज्यात कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव पुन्हा वाढू लागला.राज्यातील काही शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली त्याचा परिणाम पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शऩासाठी येणार्या भाविकांवर झाला. दिवसभरात प्रत्यक्षात तीन हजार भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार असताना केवळ आठशे ते एक हजार भाविकच मंदिरात दर्शनासाठी जात होते.
आता 15 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दक्षता म्हणून मंदिरात प्रवेश देण्यात येत असलेल्या भाविकांची संख्या कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची दखल मंदिर समितीने घेतली आहे.मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. त्यामध्ये (ता.17) पासून ऑनलाईन पद्धतीने दर्शनाचे बुकींग करुन आलेल्या केवळ पंधराशे भाविकांनाच दिवसभरात मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी सांगितले.