ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला आदेश
शेकापच्या मागणीची दखल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पूर परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या जनतेकडे कुठलीही दया माया न दाखवत महावितरण कंपनीने सुरू केलेल्या सक्तीच्या वीज बिल वसुलीविरोधात शेकापने आक्रमक होत ही वसुली थांबविण्याची मागणी शेकाप नेते पंडित पाटील यांनी केली होती. या मागणीची दखल घेत पूरग्रस्त भागात वीज बिल वसुली न करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरण कंपनीला दिले आहेत.
नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पूरग्रस्त भागात वीज बिलवसुली करु, नये असे आदेश दिले आहेत. या ठिकाणी वसुली होणार नाही. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर वीजबिलंदेखील दिली जाणार नाहीत. लोकांचे खूप मोठं नुकसान झालं आहे. परिस्थिती निवळल्यानंतर वीज बिल देत असतानाही कितपत दिलासा देऊ शकतो याचा विचार समिती करत आहे. दरम्यान, नितीन राऊत यांनी यावेळी वीजबिल माफ करण्यासंबंधंचा निर्णय मंत्रिमंडळाकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शेकापक्षाच्या मागणीची दखल घेत ऊर्जामंत्र्यांनी पूरग्रस्त भागात वीज बिलवसुली थांबविण्याचे आदेश काढून दिलासा दिला. त्याबाबत जनता आणि शेकापच्या वतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना धन्यवाद देत आहोत.
पंडित पाटील, माजी आमदार शेकाप