| पेण | वार्ताहर |
चैत्र महिन्याची चाहूल लागली की, मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. गुडीपाडवा महाराष्ट्रातील चैतन्याचा सण. या सणाला स्त्री अस्मितेच प्रतीक म्हणून साजरा करण्याची प्रथा गेल्या 12 वर्षांपूर्वी पेण शहरात सुरु झाली. महिला अत्याचार विरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे महात्मा गांधी वाचनालयात सार्वजनिकरित्या महिला वाजतगाजत मिरवणूकद्वारे गुढी उभारतात.
याबाबत नुकतीच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक झाली. यावेळी डॉ. नीता कदम, दीपश्री पोटफोडे, स्वाती मोहिते, कविता पाटील, शैला धामणकर, ज्योती राजे, संयोगीता टेमघरे आदी मंचाच्या सदस्य उपस्थित होत्या. या मिरवणुकीत सर्व जाती, धर्माच्या व वर्गाच्या महिला उपस्थित राहून सार्वजनिकरित्या गुढी उभारून ‘समतेचा’ संदेश देण्यात येणार असून, हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा असून, स्त्रियांची अस्मिता जागृत करणारा आहे.
यावर्षी नेहमीप्रमाणे प्रत्येक धर्मातील एक महिला, मोलकरीण, मतिमंद आदींद्वारे गुढी उभारली जाईल. महिला मंचाच्या वतीने पेण शहर व ग्रामीणमधील समस्त महिलांनी या रॅलीला सकाळी दहा वाजता जुन्या रायगड बाजाराजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.