। पनवेल । वार्ताहर ।
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे सिडको तर्फे सांगण्यात आले होते. मात्र, नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्गावरील काही स्थानकांचे काम अपूर्ण होते. परंतु, गेल्या दीड महिन्यात नवी मुंबई मेट्रो रेल्वे स्थानकांचे अपूर्ण काम पूर्ण होत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात नवी मुंबई मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्याने महामेट्रोने मेट्रो रेल्वेसाठी आवश्यक अधिकारी- कर्मचारी यांची भरती केली असून, सुरक्षा रक्षकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.
नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार्या नवी मुंबई मेट्रो रेल्वेचे सर्व डबे आणि विद्युत यंत्रणेला भारतीय रेल्वे मंडळाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षी या मार्गाची ऑसिलेशन, विद्युत, अत्यावश्यक ब्रेक यांच्या चाचण्या झाल्या असून, आरडीएसओ या रेल्वे संस्थेकडून प्रमाणपत्रेही मिळाली आहेत. लवकरच स्थापत्य कामांची पाहणी झाल्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आणि रेल्वे प्रशासनाकडून नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे मेट्रोसाठी लागणारे तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चौकट तीन डब्यांची मेट्रो
पेंधर, तळोजा पेठाली, अमनदूत, पेठपाडा आणि सेंट्रल पार्क स्थानक दरम्यान धावणार्या तीन डब्यांची नवी मुंबई मेट्रो रेल्वे सुरु झाल्यावर त्यासाठी लागणारे ट्राफिक कंट्रोलर, डेपो कंट्रोलर, रेल्वे गार्ड, ट्रेन ऑपरेटर, तिकीट काउंटर आदी अधिकार्याची वर्तमान पत्रात जाहिरात देवून भरती करण्यात आली आहे. भरती केलेले अधिकारी विविध मेट्रो मध्ये काम केलेले तज्ञ, प्रशिक्षित आहेत. तसेच मेट्रो रेल्वे स्थानकावर सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि स्टेशन स्वच्छतेसाठी स्वीपर आदी जवळपास दोनशे अधिकारी- कर्मचारी मनुष्यबळाची भरती करण्यात आली आहे.
नवी मुंबई मेट्रो रेल्वे मध्ये भरती करण्यात आलेले सर्व अधिकारी-कर्मचारी अनुभवी आहेत. नवी मुंबई मेट्रो रेल्वे स्थानकांची सुरक्षा कशा प्रकारे असावी, यासाठी सुरक्षा अधिकार्यांकडून सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नवी मुंबई मेट्रो रेल्वे सुरु झाल्यावर कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही, अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्व अधिकारी-कर्मचारी यांना देण्यात आले आहे, असे महामेट्रोच्या अधिकार्यांनीनी सांगितले.