। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गतवर्षी पूर, भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीच्या भरपाईसाठी केंद्रातर्फे महाराष्ट्रासह सहा राज्यांना 1682 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. यातील 355.39 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहे. राज्यांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेण्यासाठी आंतरमंत्रालयीन पथक केंद्रातर्फे पाठविले जाते. या पथकाच्या शिफारशींच्या आधारे अर्थसाहाय्य केले जाते. त्यानुसार गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडूसाठी 1664.25 कोटी रुपये आणि पुद्दुचेरीसाठी 17.86 कोटी रुपये असे एकूण 1682.11 कोटी रुपयांची मदत 2021 च्या नैसर्गिक आपत्तींसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (एनडीआरएफ) मदत जाहीर झाली. हे अर्थसाहाय्य राज्यांना दिल्या जाणार्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) व्यतिरिक्त आहे. 2021-22 या वर्षात केंद्र सरकारने ‘एसडीआरएफ’ अंतर्गत 28 राज्यांना 17,747.20 कोटी रुपये आणि ‘एनडीआरएफ’अंतर्गत 4645.92 कोटी रुपये आठ राज्यांना दिले आहेत.