। मुंबई । वृत्तसंस्था ।
गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांनंतर आज मुंबईत पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या ताडदेव परिसरातील नाना चौक भागात असणाऱ्या कमला इमारतीला आग लागली. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या घटनेत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना 5 लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.
आज सकाळी साडेसातच्या सुमारास कमला इमारतीला आग लागली. आग लागलेली इमारत ही 20 मजल्यांची असून, इमारतीच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचल्यानंतर त्यांनी त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री आदत्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरेंनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.