| मुंबई | प्रतिनिधी |
आमच्यासारख्यांनी केलेल्या त्यागामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले हे गोगावलेंचे विधान आता त्यांच्या चांगलेच अंगलट येऊ लागले आहे. आपल्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला. शिळ्या कढीला ऊत कशाला, अशी टिपण्णाी करीत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
गोगावले यांनी केलेल्या एका विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. भरत गोगावलेंनी मंत्रीपद वाटपावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. तसेच, यावेळी त्यांनी नारायण राणेंचाही उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शुक्रवारी दुपारी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते परवा सांगून झालं. आता शिळ्या कढीला ऊत देऊ नका. त्या दिवशी जे झालं, त्याचा विपर्यास केला गेला. माझा सहकारी मित्र आहे. आम्ही दोघं सकाळी सोबत होतो. आम्ही एकमेकांचं दु:ख वाटून घेतलं. मुख्यमंत्र्यांनी आमच्यात सहभाग घेतला. आम्हाला समजावलं आणि आम्ही समजलो, असं गोगावले यावेळी म्हणाले.
मी त्या दिवशी म्हणालो एक भाकरी होती. त्याची अर्धी केली, अर्धीची चतकोर केली. आता तेवढ्या भाकरीतही आम्ही वाटून घेऊ. पण एकच सांगतो, आमच्याकडून चुकीचं कधी काही जाणार नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांबद्दल तर नाहीच नाही, असंही गोगावले यांनी नमूद केलं. दरम्यान, तीन आमदार कोण होते योग्य वेळ आल्यावर सांगेन, असंही भरत गोगावले म्हणाले.
मंत्रीमंडळ विस्तारावर नाराज असल्याची चर्चा असताना त्यावरही गोगावलेंनी उत्तर दिलं आहे. आता जो होईल तो विस्तार व्यवस्थित होईल. काही कारणास्तव तो थांबला आहे. माझ्या नाराजीच्या चर्चा आहेत. पण तसं काहीही नाहीये. आम्ही नाराज असतो तर मंत्रालयात आलोच नसतो. ठीक आहे. सबुरीचं फळ गोड असतं, असंही गोगावलेंनी नमूद केलं.