शेकडो हेक्टरमधील भातपीक वाया
| माणगाव | वार्ताहर |
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे माणगाव तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीतील भातपीक पाण्याचा निचरा वेळीच न झाल्यामुळे अक्षरशः कुजले, तर काही ठिकाणी वाहून गेले असून, मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे.
यंदाचे भातपीक हातातून गेल्याने खायचे काय? या काळजीत शेतकरी पडला असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. तो कर्जबाजारीही झाला आहे. माणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात खलाटीची जमीन आहे. याच खलाटीत भातपीक उत्तम पिकते. त्याच खलाटीवर निसर्गाने घाला घातल्याने येथील शेतकर्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर पडला आहे. शासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून, ही नुकसान भरपाई शासनाकडून तुटपुंजी प्रमाणात मिळणार असल्याने त्याच्यापुढे काजवेच चमकू लागले आहेत.
माणगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे भातपिकासह नाचणी, वरी व भाजीपाला पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, हजारो शेतकर्यांचे प्रथमदर्शनी नुकसान झाल्याची बाब पुढे येत असून, यात 200 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. माणगाव तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात सुमारे 12250 हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची शेतकर्यांनी लागवड केली आहे. अतिवृष्टीमुळे भातपिक कुजले होते. त्यामुळे नुकसान झालेल्या भातपिकाचे त्वरित पंचनामे करावेत व शेतकर्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. भातशेतीबरोबरच नाचणी, वरी, तीळ, भाजीपाला व बागायतदारांचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बागायतदारही मोठ्या संकटात सापडला आहे.