। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत येणार्या कर्मचार्यांना नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे. ही योजना अन्यायकारक असुन सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकरीता बुधवारी (दि.21) रायगडात सर्व तालुक्यात प्रातिनिधीक स्वरुपात तसेच अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती.
अलिबाग येथे ही रॅली सकाळी 10 वा. संघटना सदन, अलिबाग येथून सुरु होऊन सामाजिक वनीकरण कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसिलदार कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय, उप वनसंरक्षक कार्यालय येथे भेट देवून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला.
संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन सादर केले. या रॅलीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, राज्य प्रतिनिधी परशुराम म्हात्रे, कोषाध्यक्ष दर्शना पाटील, सहचिटणीस प्रफुल्ल कानिटकर, मौलेश तायडे, तसेच तालुका सरचिटणीस दर्शना कांबळे, रायगड जिल्हा गट -ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी संघटना सरचिटणीस विकास पवार, तसेच रायगड जिल्हा तलाठी संघटना अध्यक्ष वल्लभ मसके, तसेच राजेश थळकर, मयुर नाईक, सुभाष पाटील, प्रल्हाद भगत, मल्हार येवतिकर, विक्रम वडके, सत्यवान पाटील, इत्यादी पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.