शेतकरी कामगार पक्षाची शासनाकडे मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
ऑनलाईन ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत संपली आहे. त्याचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन ई पीक नोंदणीची मुदत तातडीने वाढवावी आणि ऑफलाईन नोंदणीला परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. याबाबत अलिबागचे निवासी नायब तहसिलदार अमोल शिंदे यांना शेकापच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, सुरेश घरत, संजय माळी आदी उपस्थित होते. ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत27 नोव्हेंबर होती. परंतु बहुतांश ग्रामीण भागात जनजागृती झाली नसल्याने अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अनावधानाने राहून गेली. मात्र ई पीक पाहणीची नोंदणी झाली नसल्याने अनेक शेतकऱ्यांना भात खरेदी- विक्री करण्यास अडथळे निर्माण होत आहे. ऑनलाईन नोंदणीची मुदत संपल्याचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे या नोंदणीची मुदत वाढवून मिळावी. तसेच ही नोंदणी ऑफलाईन करून देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.