| पाताळगंगा | वार्ताहर |
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षापूर्वी शेडवली येथे वनविभागाच्या जागेत हजारो वृक्ष लागवड करण्यात आली होती. आज हे वृक्ष डोलाने उभे राहिले आहेत. अनेक ठीकानी वृक्षारोपण केल्यानंतर त्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. परंतू प्रतिष्ठानांच्या माध्यमातून केलेली या वृक्षांची लागवड श्री सदस्य मनापासून करीत आसल्याने या ठिकाणी सध्या वनराई फुलल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दरवर्षी श्री प्रतिष्ठानांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. गेले अनेक वर्ष पावसाळ्यात वृक्ष लागवड आणी त्यांचे संवर्धन हा कार्यक्रम हाती घेण्यात येत असतो. रायगडसह खालापूर तालुक्यातही अनेक ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. पिंपळ, निळगिरी, कडुनिंब, ताम्हण, करंज, आर्जुन, रिठा सफकर्णी, कुंतजीवा, निंबारा, रेन ट्री, वड या वृक्षांची लागवड करण्यात आली. पावसाळ्यात लावलेल्या या वृक्षांच्या बाजूला वाढलेले गवत काढून गुरांपासून या वृक्षांचे संरक्षण व्हावे, यासाठी झाडांभोवती लाकडाचे कुंपण घालण्यात आले आहे. सध्या श्री सदस्यांकडून या झाडांना पाणी घातले जात असून लावलेली झाडे सध्या चांगलीच वाढली दिसत आहेत.