| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा 91. 25 टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात 2.97 टक्के घट झाली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.1 टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी 88.13 टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 4.59 टक्क्यांन अधिक आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. 3 हजार 195 मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.
विभागीय मंडळनिहाय निकाल
पुणे : 93.34 , नागपूर – 90.35,औरंगाबाद – 91.85 ,मुंबई – 88.13,कोल्हापूर – 93.28,अमरावती – 92.75,नाशिक – 91.66,लातूर – 90.37 ,कोकण – 96.1 टक्के
23 विषयांचा 100 टक्के निकाल
यंदाच्या वर्षी विविध भाषांमधून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 154 विषयांसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी तब्बल 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. राज्यातील तब्बल 17 महाविद्यालयांतील विज्ञन शाखेचा निकाल शून्य टक्के लागला असला तरीही याच शाखेत 2023 मध्ये सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाखेनुसार निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- विज्ञान शाखा : 96.09 टक्के, कला शाखा : 84.05 टक्के, वाणिज्य शाखा : 90.42 टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रम 89.25 टक्के.