अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
| मुंबई | प्रतिनिधी |
गणेशोत्सवासाठी यंदा गावी जायचेच असा निर्धार केलेल्या हजारो चाकरमान्यांना अवघ्या काही मिनिटांमध्ये सर्व गाड्यांची तिकीटे बूक झाल्याने निराश व्हावे लागले. एका मिनिटात हजारो तिकीटे आरक्षित कशी होतात? असा प्रश्न चाकरमान्यांकडून उपस्थित होत असतानाच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिले आहे.
त्यांनी पत्रात म्हटले की, मुंबईच्या छत्रपती टर्मिनसवरून 15 सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेची प्रतिक्षायादी अवघ्या दीड मिनिटातच हजारापार गेल्याची बाब समोर आली आहे. तर 16 सप्टेंबरचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना सर्वच गाड्यांसमोर ‘रिग्रेट’ हा मेसेज येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असावेत, अशी शंका घेण्यास वाव आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, असेही ते म्हणाले.
गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा निर्धार केलेले हजारो चाकरमानी तीन महिने अधिपासूनच गावी जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. त्यामुळे त्याआधीच्या किमान दोन दिवसांचे म्हणजे 17 सप्टेंबरचे या प्रवसाच्या तारखेचे 120 दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले. मात्र पहिल्याच दिवशी अवघ्या एक ते दोन मिनिटात आरक्षण पूर्ण झाले तर प्रतिक्षायादीचे लांबच्या लांब फलक लागले आहेत. हा प्रकार म्हणजे रेल्वेच्या आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता अधिक आहे, अशी शंका अजित पवारांनी व्यक्त केली.
रेल्वे तिकीटाची अवैध विक्री दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करुन ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. सर्वसामान्य प्रवासी सण उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरू आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत. या गैर प्रकारात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वने चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्यात याव्यात, अशी विनंतीही अजित पवार यांनी केली.