अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी घडलेली भीषण दुर्घटना अत्यंत निंदनीय असून, त्यात झालेला 11 रुग्णांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी म्हणायला हवा. तसेच, अद्याप आपण अशा प्रकारच्या अलीकडच्या काळात अनेक दुर्घटना घडूनही त्यातून कोणताही धडा घेतला नसल्याचेही स्पष्ट दिसते. येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून उपचार घेणारे दगावले आणि अन्य काही जखमीदेखील झाले. या विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते आणि ते सगळे रुग्ण कोरोनाबाधित होते. एका जीवघेण्या नैसर्गिक आपत्तीपासून प्राण वाचवण्यासाठी त्यांनी ज्या जीवनदायी रुग्णरलयात आश्रय घेतला, तेथेच त्यांचा असा आग लागून अंत ओढवावा, हे हताश करणारे आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मृतांच्या आप्तांना मदतही जाहीर केली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आता हे नित्याचेच झाले आहे की काय, असे वाटावे इतके सारखे वाटण्यासारख्या घोषणा आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असल्याच्या घोषणा झाल्या होत्या. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्येही आस्थापनीय सुविधा मजबूत करण्याबरोबरच, सर्व प्रकारची खबरदारी घेण्यावरही भर दिला गेलेला होता. असे असूनही गेल्या वर्ष-दीड वर्षात अनेक ठिकाणी आगी लागल्या, प्राणवायूच्या अपघाती गळतीच्या, प्राणवायू पुरवठ्यातील अडथळ्यांच्या दुर्घटना घडल्या. त्यात राज्यातील 76 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी नगरप्रमाणेच भंडारा येथील शासकीय रुग्णालयामधील अतिदक्षता विभागाला आग लागली होती. त्यात दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे मुंबईतील भांडुप, विरार व मुंब्रा येथील तसेच नागपूरमधील खासगी रुग्णालयांमध्ये आगी लागून त्यातील अतिदक्षता विभागातील रुग्ण दगावले होते. नाशिकमध्ये महानगरपालिकेच्याच रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीत गळती होऊन कोरोनाबाधित रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा रोखला गेल्याची दुर्घटना घडली होती व त्यात 22 जण दगावले होते. म्हणजे, रुग्णालयातील आगींच्या दुर्घटनेत 54, तर प्राणवायूच्या टाकीच्या गळती प्रकरणामुळे प्राणवायू थांबून 22 जण मृत्युमुखी पडले. या प्रत्येक दुर्घटनेनंतरही अशाच घोषणा झाल्या आणि मदतही देण्यात आली. मात्र, त्यामुळे माणूस परत येऊ शकत नाही. तो तात्पुरता दुःखावर फुंकर घालण्यासारखा दिलासा असतो. या आधीच्या दुर्घटनांची चौकशी होऊन त्यात किती दोषींवर कारवाई झाली, हे पाहण्यासाठी कदाचित अजून एक चौकशी समिती नेमावी लागेल. सरकारने हे प्रकार गंभीरपणे घ्यायला हवेत आणि त्याच्या कारणांच्या मुळाशी जायला हवे. कारण, अहमदनगरमधील हा कोव्हिड अतिदक्षता कक्ष नवीन बांधला गेलेला आहे. तरीही तेथे आग लागते, हे गंभीर आहे. या दुर्घटनेवरुन विरोधकांनी सरकारला लक्ष्य करणे साहजिक आहे. ते त्यांचे काम आहे. त्याच वेळी सरकारने या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन जनतेला संतुष्ट होईल, अशी कारवाई आणि उपाययोजना करण्यावर भर देणे आवश्यक आहे. सत्तारूढ पक्षाने याप्रकरणी विनाकारण जबाबदारी झटकण्याच्या हेतूने संशयाचे वातावरण निर्माण होईल असे वक्तव्य टाळायला हवे. या ठिकाणी पाहणीसाठी गेलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ही आग तेथील व्हेंटिलेटरमधून भडकल्याचे आपल्याला कर्मचार्यांनी सांगितल्याचे सांगितले आणि कोरोना काळात पीएम केअर फंडातून देण्यात आलेले व्हेंटिलेटर येथे आहेत, त्याकडेच त्यांनी अंगुलीनिर्देश केला. मात्र, तात्पर्याने यासंबंधी चौकशी झाल्याशिवाय घाईघाईने कोणालाही दोष देता येणार नाही, असेही ते म्हणाले. आगीचे कारण शॉर्ट सर्किटमुळे झाले, हे प्रथमदर्शनी दिसून आले, हे खरे आहे. मात्र, त्याबद्दलची पूर्ण चौकशी झालेली नसताना केंद्र सरकारकडे बोट दाखवणे योग्य नाही. स्थानिक जिल्हा प्रशासनाने संपूर्ण माहिती जाहीर करण्याआधी अशी वक्तव्ये बेजबाबदार ठरतात आणि मारक ठरतात. तसा पुरेसा पुरावा असला, तर ही गोष्ट लक्षात आणून देत त्रुटी दूर करणे कर्तव्य ठरते. यानिमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण जनतेने जातीधर्माच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मजबूत पायाभूत सुविधा आणि जीवरक्षक व्यवस्था यांचा आग्रह धरणारा अजेंडा राजकारण्यांपुढे मांडणे आवश्यक आहे. पुन्हा कोणाचे तरी जीव जाण्याचा धोका टाळण्यासाठी ते आवश्यक आहे, हे वेळीच लक्षात घेतलेले बरे!