महाविकास आघाडीसह संयुक्त शेतकरी आघाडीचा पाठिंबा
मुंबई | प्रतिनिधी |
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरुन हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी 11 ऑक्टोबर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.या बंदमध्ये सत्ताधारी शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष,संयुक्त शेतकरी,कामगार आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकर्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदी हाक दिली आहे.. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली होती.त्यानुसार 11 ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद पाळला जाणार आहे.
जयंत पाटील म्हणाले, आम्ही लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराविरोधात 11 ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूरला शेतकर्यांना चिरडून मारण्याची जी घटना घडली त्याचा महाराष्ट्रात निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र 11 ऑक्टोबरला बंद करत आहोत. मंत्रिमंडळाने देखील याबाबत खेद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र बंद ला शेकापचा पाठिंबा!
लखीमपूर खेरी येथील निर्घृण हत्याकांडामुळे संपूर्ण देशाला धक्का पोहोचला आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून,कार्यकर्त्यांसह संवेदनशील नागरिकांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,असे आवाहन शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यानी केले आहे.
या संदर्भात पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अॅड.राजू कोरडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, अन्यायकारक कृषी कायदे रद्द करावेत यासाठी सर्व प्रकारच्या चिथावण्या झुगारून, गेल्या दहा महिन्यांपासून शेतकर्यांचे आंदोलन अत्यंत शांततेत सुरू आहे. शेतकरी आंदोलनाने मोदी सरकारने पारित केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे आम्ही मोदी सरकारने संमत केलेल्या चार कामगार विरोधी संहिता आणि वीज सुधारणा विधेयक 2021 रद्द करण्याची मागणी करत आहोत,असे सुचित करण्यात आले आहे.
भारतीय शेतकरी कामगार पक्ष आणि विविध डावे आणि लोकशाहीवादी राजकीय पक्ष, कामगार संघटना, जनवादी संघटना, महिला, विद्यार्थी व युवा संघटना महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत.
गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत, मुंबई आणि महाराष्ट्रात स्थानिक मेळावे आणि मोठ्या जाहीर सभा आयोजित करुन मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे.सोमवारी होणार्या महाराष्ट्र बंदला असाच उदंड प्रतिसाद द्यावा,असे आवाहनही या निवेदनातून करण्यात आले आहे.
लखीमपूर खेरी येथे झालेल्या निर्घृण हत्याकांडासंदर्भात मुक्त आणि निष्पक्ष तपास होण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्री अजय मिश्रा यांनी त्वरित राजीनामा द्यावा. तपास न्यायपालिकेच्याच देखरेखी खाली व्हावा आणि सर्वोच्च/उच्च न्यायालयाच्या सिटिंग जज द्वारे तपासणी व्हावी,अशी मागणीही शेकापने केलेली आहे.
काँग्रेसचे मौनव्रत
लखीनपूर खेरा हिंसाचार प्रकरणी काँग्रेसतर्फे सोमवारी मौनव्रत आंदोलन केले जाणार आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुखांना तीन तास मौन पाळण्यास सांगितले आहे. हे मौन आंदोलन सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान राजभवन किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयाबाहेर पाळले जाणार आहे.
काँग्रेसचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार
देशाला हादरवून टाकणार्या लखीमपूर शेतकरी हत्याकांडप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांचं शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. या भेटीसाठी राष्ट्रपतींची अपॉईंटमेंट मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
डबेवाल्यांचा सहभाग
सोमवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.वमुंबई डबेवाला असोशियसनही या बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून हा बंद सुरू होणार आहे.