| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई -गोवा महामार्गाचे काम 2011 साली रुंदीकरणाचे काम सुरू झाले, दोन वेळा कंत्राटदार बदलूनसुद्धा अद्याप मोठ्या प्रमाणात काम अपूर्ण असून नागरिकांना धुळीचा आणि खड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण काम होईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. पनवेल (पळस्पे ) ते इंदापूर या 84किलोमीटर लांबीतील चौपदरीकरणाचे आणि डांबरी करणाचे काम खाजगी करणांतर्गत मे.सुप्रीम इंदापूर टोलवेज प्रा.लि. ह्या सवलतीदारामार्फत डिसेंबर 2011 पासून प्रगती पथावर आहे. सवलत करारनाम्यानुसार हा रस्ता बांधा ,वापरा व हस्तांतरीत करणे या तत्वावर 21 वर्षांसाठी सवलतदारास देण्यात आला आहे . सद्यस्थितीत 88टक्के काम पूर्ण झाले आहे . उर्वरित काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मूळ करार समाप्त करण्याचे आदेश 17-11-2021 रोजी देण्यात आले आहेत. त्यामुळे सवलतदाराने या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असून सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात आहेत.
इंदापूर ते झाराप या रस्त्याच्या चौपदरी करणाचे काँक्रीटीकरणाचे काम राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळ यांचेमार्फत सुरू आहे . सदर महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम करताना बर्याच ठिकाणी तात्पुरते वळण रस्ते करावे लागत असल्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे कायम स्वरूपी टँकरने पाणी मारण्याची व्यवस्था कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे . तसेच अतिवृष्टी व कामावरील अवजड यांत्रिक गाड्यांमुळे पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर डांबरी पृष्ठ भागावर पडलेल्या खड्यांची दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदाराला सूचना देण्यात आल्या आहेत . तसेच बाधित होणार्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांचे स्थानांतरण करण्यात येत आहे . त्यामुळे नागरिकांना पाणी टँचाई चा सामना करावा लागू नये म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खबरदारी घेत आहे. असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सभागृहात सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेस उत्तर देताना स्पष्ट केले .