श्रद्धा कानडे आदर्श सरपंच, तर रसिका फाटक आदर्श शेतकरी
| पाली/बेणसे | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा कानडे व कृषीकन्या रसिका फाटक या रणरागिणींचा ङ्गनवराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्ड 2021फने सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी निधी चौधरी, भाजप महिला आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ, सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, पिल्लई शिक्षण समूहाच्या निवेदिता श्रीयंस, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नवभारत समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास राव यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा कानडे यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील आदिवासीपाड्यांवर अनेक उपक्रम राबवलेले आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंच झाल्यानंतर शासनाच्या अनेक योजना गोरगरीबांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्य केले आहे. माजी सरपंच गणेश कानडे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना कालावधीत त्यांनी उल्लेखनिय काम केले आहे. यामुळे या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे.तर कोव्हिड काळात आपले वर्षभराचे मानधन 50हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत रायगड मधून आदर्श सरपंच म्हणून नवराष्ट्र कडून त्यांना गौरविण्यात आले. तर सुधागडातील युवा महिला शेतकरी रसिका फाटक हिने बीएससी अॅग्रीकल्चरची पदवी संपादन करून वयाच्या तेविसाव्या वर्षीच शेती क्षेत्रात पदार्पण करून नवनवीन प्रयोग केले आहेत. रसिका ही शेतीबरोबरच इतरही शेतकर्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करते. तिच्या कुशालतेची दखल घेत नवराष्ट्रकडून रसिका हिस आदर्श शेतकरी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दोघींच्या या यशाबद्दल संबंध सुधागडातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.