| मुंबई | वार्ताहर |
मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याच्या संदर्भात समिती नेमण्यात आली असून तिला महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबईत दिली. या अहवालानंतर आरक्षणाबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल असेही ते म्हणाले. दरम्यान, जालन्यातील लाठीहल्ल्याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनशर्त माफी मागितली असून संबंधितांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढेपर्यंत आपण आपले उपोषण सोडणार नसल्याचे मनोज जरंगे यांनी जाहीर केल्याने याबाबतचा पेच कायम आहे. राज्यात अजूनही ठिकठिकाणी बंद व मोर्चे यांचे सत्र चालूच आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे यांनी सोमवारी याबाबतच्या मंत्रीमंडळ उपसमितीची एक तातडीची बैठक बोलावली होती. याच दरम्यान शिंदे व फडणवीस यांनी जालन्यातील आंदोलक जरंगे यांच्याशीही फोनवरून तसेच अर्जुन खोतकर यांच्यामार्फत चर्चा केली. त्या बैठकीनंतर शिंदे, फडणवीस व पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे व ते न्यायालयातही टिकले पाहिजे ही भूमिका आमची आहे. त्यासाठी आम्ही टास्क फोर्सची स्थापना केली आहे असे शिंदे यांनी सांगितले. या प्रश्नी विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार मराठा आरक्षणबाबत अतिशय गंभीर आहे. हे आरक्षण महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात घालवले. जे नेते मराठा समाजाचा पुळका आला असे दखवत आहेत त्यांनी आरक्षण घालवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी वटहुकुम काढण्याची मागणी केली आहे. मग ते मुख्यमंत्री असताना त्यांनीच तो का काढला नाही असा सवालही त्यांनी केला.
जरंगे आपल्या भूमिकेवर ठाम
दरम्यान, आमच्यात आता तह करून नंतर लढत राहण्याची ताकद उरलेली नाही, मराठ्यांच्या पोरांच्या पदरात जीआरचे दान टाका, असं आंदोलक जरांगे यांनी सरकारला उद्देशून म्हटले आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन जालन्यातील आंदोलनस्थळी पोहोचले. मनोज जरांगे यांच्याशी फोनवरुन मुख्यमंत्र्यांचा संवाद साधून दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
‘अजित पवार बाहेर पडा’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळच्या काटेवाडी गावात सकल मराठा समाजाच्या वतीने एक मोर्चा काढून जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. यामध्ये एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोंवर फुल्या मारण्यात आल्या होत्या. नंतर बारामतीतही मोठा मोर्चा निघाला. यामध्ये सरकारच्या ‘पापाचा भरलाय घडा, अजित पवार सरकारबाहेर पडा’ अशा घोषणा देण्यात आल्या. बारामतीत आज बंदही पाळण्यात आला.
तर राजकारण सोडू…
जालन्यातील आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचा आदेश वरून देण्यात आल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी चांगलेच संतापले. शिंदे, फडणवीस किंवा मी यापैकी कोणीही असे आदेश दिल्याचे विरोधकांनी सिध्द करून दाखवले तर आम्ही राजकारण सोडू असे थेट आव्हान त्यांनी पत्रकार परिषदेत दिले. जर विरोधक हे सिध्द करू शकले नाहीत तर त्यांनी राजकारण सोडावे असे प्रतिआव्हानही त्यांनी दिले.
लाठीहल्ल्याचे आदेश देणारे कोण – राज ठाकरे यांचा सवाल
जालना येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “राजकारण्यांच्या नादी लागू नका हे मी आधीच सांगितले आहे. जालना येथील लाठीमाराबद्दल पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत. सत्तेत नसतांना मोर्चे काढतात आणि सत्तेत आल्यावर गोळ्या झाडल्या जात आहेत. फडणवीस म्हणतात राजकारण करू नका, पण फडणवीस विरोधात असते तर त्यांनी काय केले असते? मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितले होते. मला या नेत्यांप्रमाणे खोटे बोलता येणार नाही. मी याबाबत मुख्यंमत्री यांची भेट घेणार आहे.