दररोज 100 स्वयंसेवकांचा सेवाकार्यात सहभाग
| चिपळूण | वार्ताहर |
चिपळूण शहरात नुकत्याच आलेल्या महापुरामुळे चिपळूण तसेच आजूबाजूच्या गावांतील दुकानांचे आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले. शेकडो दुकानांसह घरामध्ये पाणी घुसल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून, तेथील रस्ते, गटारे आणि घरांची साफसफाई करण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या चिपळूण झोनच्या अंतर्गत रत्नागिरी क्षेत्रातील 100 सेवादलांची मोठी तुकडी गेले पाच दिवस खाकी वर्दीमध्ये सेवा करीत आहे. हे सेवाकार्य पूर्ण शहरातील रस्ते आणि बाधित घरांची साफसफाई होईपर्यंत सुरू राहणार आहे. संत निरंकारी मिशन गेली 90 वर्षे अध्यात्माबरोबरच सामाजिक क्षेत्रातदेखील भरीव योगदान देत आहे. स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर इत्यादी समाजोपयोगी उपक्रम संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविले जातात.
दरम्यान, महापुराच्या आपत्तीत घरांचे आणि दुकानांचे नुकसान झालेल्या घटनेची माहिती प्राप्त होताच चिपळूण क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक प.पू. गंगाधर विचारे आणि क्षेत्रीय संचालक प.पू. उमेश भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात बाधित कुटुंबांना दररोज 500 जेवण पाकिटे आणि पाणी बॉटल पोहचविण्याची सेवा सुरू आहे. पूर ओसरल्यानंतर प्रशासनच्या निर्देशाप्रमाणे मिशनने शहर साफसफाईचे कार्य हाती घेतले. यासाठी लागणारे सर्व साहित्य संत निरंकारी मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग आणि मुंबईहून सेवादल या सफाई अभियानात सहभागी झाले आहेत.
चिपळूणचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार सेवादलाच्या तुकड्या साफसफाई करीत असून, अजूनही काही दिवस हे सफाई अभियान चालू राहणार आहे, अशी माहिती उमेश भागडे यांनी दिली आहे.