। मुंबई । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेच्या 85 जागांपैरी 76 जागांचे कल हाती आले आहेत. त्यापैकी 19 जागांवर भाजपने आघाडी घेऊन आपणच राज्यात नंबर वन असल्याचं दाखवून दिलं आहे. तर काँग्रेसने 16, राष्ट्रवादीने 14, शिवसेनेने 11 आणि इतरांनी 15 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आघाडी आणि युतीनिहाय आकडेवारी पाहता महाविकास आघाडीने 42, भाजपने 19 आणि इतरांनी 15 जागांवर आघाडी घेतली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पक्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास भाजप स्वबळावर लढूनही नंबर वन ठरला आहे. मात्र, आघाडी आणि युतीच्या आकडेवारीकडे पाहिल्यास महाविकास आघाडीने भाजपला पिछाडीवर टाकल्याचं दिसत आहे. त्यामुळे तीन पक्षांच्यासमोर भाजपचा टिकाव लागत नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
पंचायत समितीच्या 144 पैकी 66 जागांचे निकाल हाती
पंचायत समितीच्या 144 पैकी 66 जागांचे कल हाती आले आहेत. पक्षनिहाय आकडेवारी पाहता पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपने वर्चस्व मिळवलं आहे. भाजपने 22, काँग्रेसने 18, शिवसेना 9, राष्ट्रवादीला 8 आणि इतरांना 9 जागांवर आघाडी मिळाली आहे. तेच आघाडी आणि युतीची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला 35, भाजपला 22 आणि इतरांना 9 जागांवर आघाडी मिळाली आहे.
भाजपच्या नाकीनऊ
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत अनेक ठिकाणी महाविकास आघाडीची आघाडी होती. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष स्वबळावर लढले. तर भाजपने रिपाइं, रयत क्रांती संघटना आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवल्या होत्या. पक्ष म्हणून भाजपला या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आहे. पण युती म्हणून भाजप पिछाडीवर गेली आहे. त्यामुळे नंबर वन पक्ष असूनही उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता मिळवताना भाजपला नाकीनऊ येणार आहेत. अधिक जागा असूनही केवळ आघाडीच्या राजकारणामुळे भाजपला जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीतील सत्तेतून वंचित राहावं लागणार आहे.
जिल्हा परिषद 85 पैकी 76 जागांचे कल
भाजप-19
राष्ट्रवादी- 15
शिवसेना-11
काँग्रेस-16 इतर- 15
मविआ- 42
भाजप -19
इतर – 15
पंचायत समिती 144 पैकी 66 जागांचे कल
भाजप- 22
शिवसेना- 9
राष्ट्रवादी -8
काँग्रेस -18 इतर- 9
मविआ- 35
भाजप- 22
इतर- 9