नाशिक
नाशिक । प्रतिनिधी
निर्यातीवरील बंदी उठविल्यानंतर घाऊक बाजारात कांद्याचे दर प्रति क्विंटलला 400 ते 500 रुपयांनी वधारले आहेत. परंतु, क्विंटलला अडीच हजार रुपयांवर गेलेला कांदा कितपत निर्यात होईल, याविषयी जाणकारांना साशंकता आहे. जेव्हा देशांतर्गत भाव कमी असतात, तेव्हा जादा निर्यात होते. विपुल उत्पादनामुळे 2018-19 या वर्षांत 24 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती. चालू वर्षांत टाळेबंदीमुळे हे प्रमाण निम्म्याने कमी झाले.
चार महिन्यांपूर्वी कांदा भावाने उच्चांकी पातळी गाठल्यानंतर सप्टेंबरच्या मध्यावर केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी आणली. सरासरी पाच ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत उंचावलेले दर दीड हजार रुपयांपर्यंत घसरले. नव्या लाल कांद्याची मोठया प्रमाणात आवक होत आहे. घसरण रोखण्यासाठी निर्यात खुली करण्याची मागणी उत्पादकांपासून ते बाजार समिती, राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी करीत होते. तो निर्णय झाल्यानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
भविष्यात भाव वधारल्यास राजकीय फायदे-तोटे पाहून पुन्हा निर्यातीवर बंदी लादली जाणार नाही, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. निर्यात खुली झाल्यामुळे घसरण थांबून दर वाढल्याकडे दिंडोरीच्या भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी लक्ष वेधले. डिसेंबरपासून नव्या कांद्याची आवक होऊ लागली. जुना उन्हाळ कांदा शेतकर्यांकडे शिल्लक आहे. या स्थितीत जुन्या-नवीन कांद्याची सांगड घालण्यासाठी निर्यात होणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात. निर्यात खुली केल्याचा लाभ उत्पादकांना होणार असल्याचे नाशिक कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी नमूद केले. बांगलादेश, कोलंबो, मलेशियासह अन्यत्र कांदा जाईल. निर्यातीत चव ही बाब महत्त्वाची ठरते. भारतीय कांद्यास जी चव आहे, ती पाकिस्तान वा अन्य देशांच्या कांद्याला नाही. त्यामुळे भारतीय कांद्याला परदेशातून कायमस्वरूपी मागणी असते. पुढील काळात निर्यातीला अधिक चालना मिळणार असल्याचे भंडारी यांचे म्हणणे आहे.