24 वर्षांच्या इतिहासात नऊ थरांची विक्रमी सलामी; पुरुषांत मरीआई मेटपाडा, महिलांत भोनंग पथक अव्वल
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिद्द असावी तर अशी..! एक.. दोन नव्हे तर, तब्बल 21 वर्षांची मेहनत… डोक्यावर एकावर एक रचलेले नऊ थर… क्षणाक्षणाला वाढणारा तणाव… हजारो प्रेक्षकांचा कडकडाट आणि ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषात पहाटे 3 वाजून 26 मिनिटांनी मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाने सात थरांवर दहीहंडी फोडत अलिबागच्या दहीहंडी इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याआधी तब्बल नऊ थरांची विक्रमी सलामी देत या पथकाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. रायगडमध्ये प्रथमच नऊ थरांची सलामी देण्याचा मान मरीआई मेटपाडाने पटकावला. पुरुष गटात मरीआई मेटपाडा, तर महिला गटात भोनंग महिला गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावत विजयाची मोहोर उमटवली.
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक आघाडी पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित ‘मानाची दहीहंडी उत्सव 2026’ मोठ्या उत्साहात पार पडला. 24 वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात यंदा नऊ थरांच्या विक्रमी सलामीने दहीहंडीचा थरार आणखी उंचावला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली चुरस पहाटेपर्यंत कायम राहिली.
मानाच्या दहीहंडीच्या पुरुष गटात मरीआई मेटपाडा पथकाने सात थर रचत दहीहंडी फोडली. विजेत्या पथकाला 2 लाख 51 हजार रुपये आणि मानाचा चषक देऊन गौरविण्यात आले. महिला गटात भोनंग महिला गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावत 1 लाख 1 हजार रुपये आणि मानाचा चषक मिळवला. नऊ थरांची विक्रमी सलामी दिल्याबद्दल मरीआई मेटपाडा पथकाला प्रशांत नाईक यांच्या वतीने एक लाख रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात आले. आठ थर रचणाऱ्या कोळीवाडा गोविंदा पथकाला 50 हजार, तर सहा थर रचणाऱ्या पोहरादेवी-शास्त्रीनगर महिला पथकाला 21 हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात आले.
पहाटे 3 वाजून 26 मिनिटांनी मरीआई मेटपाडा पथकाने सात थरांवर दहीहंडी फोडताच परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने आणि गोविंदांच्या घोषणांनी दुमदुमून गेला. नऊ थरांची विक्रमी सलामी आणि त्यानंतर सात थरांवर दहीहंडी फोडण्याचा थरार यंदाच्या उत्सवाचा अविस्मरणीय क्षण ठरला.
दहीहंडी फुटल्यानंतर आयोजक प्रशांत नाईक यांनी विजेत्या पथकांसह सर्व सहभागी गोविंदा पथकांचे अभिनंदन केले. नऊ थरांची विक्रमी सलामी देणाऱ्या मरीआई मेटपाडा पथकाचे विशेष कौतुक करत त्यांनी गोविंदांच्या मेहनतीला, धाडसाला आणि एकजुटीला दाद दिली. महिला गटातील विजेत्या भोनंग पथकाचेही त्यांनी अभिनंदन केले. यावेळी गोविंदा, कार्यकर्ते आणि उपस्थितांनी प्रशांत नाईक यांच्यासोबत जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.
यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्यासह शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख तथा उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, नगराध्यक्षा अक्षया नाईक, बांधकाम सभापती प्रशांत नाईक, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, अलिबाग नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती अनिल चोपडा, महिला व बालकल्याण सभापती डॉ. साक्षी पाटील, उपसभापती ॲड. अश्विनी ठोसर, वृषाली ठोसर, ॲड. निलम हजारे, संजना कीर, संतोष गुरव, संध्या पालवणकर, ॲड. निवेदिता वाघमारे, प्रिया वेलणकर, अजय झुंजारराव, युवराज पाटील, प्रीती झुंझारराव योजना पाटील, जमाल सय्यद, ऋषिकेश माळी, अवधूत पाटील, नागेश कुलकर्णी, सतीश प्रधान, सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशांत नाईक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
24 वर्षांची परंपरा, 2005 पासूनची थरांची जिद्द आणि अखेर रायगडमध्ये नऊ थरांची विक्रमी सलामी देत मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाने यंदाची ‘मानाची दहीहंडी’ अक्षरशः गाजवून सोडली. पुरुषांबरोबरच महिला गोविंदा पथकांचा दमदार सहभाग यामुळे प्रशांत नाईक मित्रमंडळाची 24 वर्षांची ‘मानाची दहीहंडी’ यंदा विशेष ठरली.
2005 पासून थरांचा थरार!
मरीआई गोविंदा पथकाची स्थापना 2005 मध्ये झाली. सुरुवातीला अवघ्या 70 ते 80 गोविंदांसह सुरू झालेल्या या पथकाने त्याच वर्षी तीन एक्के लावत सात थर रचले. 2012 मध्ये माजगाव ताडवाडी आणि जय जवान गोविंदा पथकानंतर चार एक्के लावत देशात तिसरा मान पटकावण्याची कामगिरीही पथकाने केली. त्यानंतर सात थरांची परंपरा सातत्याने कायम ठेवत पथकाने आपली ओळख अधिक भक्कम केली. 2024 मध्ये प्रथमच आठ थरांचा प्रयत्न झाला; मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतर जिद्द न सोडता 2025 मध्ये कर्मभूमीवर प्रथमच आठ थर यशस्वीपणे रचून उतरवण्यात आले. त्याच वर्षी दहीहंडीच्या दिवशी तब्बल तीन वेळा आठ थर रचून सुखरूप उतरणारे रायगड जिल्ह्यातील एकमेव पथक ठरण्याचा मानही मरीआई मेटपाडाने मिळवला. 2026 मध्ये पथकाने विविध ठिकाणी तब्बल 50 ते 55 वेळा सात थर, तर 8 ते 10 वेळा आठ थर यशस्वीपणे रचून उतरवले. अखेर 2 सप्टेंबर 2026 रोजी दक्षिण कोकण विभागातील पहिले नऊ थर रचून या पथकाने आपल्या कामगिरीला नवे शिखर गाठले.
80 गोविंदांपासून 300 पर्यंतचा प्रवास
मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाचा विस्तार आता केवळ मेटपाड्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. पथकातील खेळाडूंची संख्या तब्बल 250 ते 300 पर्यंत पोहोचली आहे. सिद्धार्थनगर, शास्त्रीनगर, अलिबाग कोळीवाडा, वरसोली कोळीवाडा, रामनाथ, चालमाला, कुरूळ, नागाव, चौल, वायशेत, मानी भुते यांसह अलिबाग शहरातील विविध भागांतून तरुण या पथकात सहभागी होत आहेत.
अन् रोखले गेले श्वास...!
अलिबागेत उपस्थित असणाऱ्या हजारो प्रेक्षकांनी हा थरार अनुभवला. ‘गोविंदा’च्या गजरात एक... दोन... तीन... म्हणत प्रत्येक थर उंचावत गेला. आठवा थर चढताना प्रेक्षकांचा श्वास रोखला गेला आणि नववा थर पूर्ण होताच जल्लोषाच्या आरोळ्या दुमदुमल्या. गोविंदा पथकांचे खरे किंग आम्हीच, असा दमदार संदेश या थरारक कामगिरीत मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाने दिला.










