मुंबई
मुंबई: प्रतिनिधी
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं रविवारी ( 16 मे) निधन झाले. राजीव सातव यांना कोरोनाची लागत झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. पुण्यात जहांगिर हॉस्पिटलमध्ये त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. 23 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असणार्या काँग्रेस खासदार राजीव सातव यांची जगण्याशी झुंज अपयशी ठरली आहे.राजीव सातव यांच्या निधनाबद्दल राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक प्रकट केला आहे. सातव यांची राजकीय कारकिर्दही हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समिती सदस्य ते खासदार अशी झाली.हिंगोली जिल्हा परिषद सदस्य ,कृषी व पशुसंवर्धन सभापती,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष,कळमनुरी विधानसभेतून पहिल्यांदा आमदार,अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार काँग्रेसचे ते गुजरात प्रभारी महाराष्ट्रातून राज्यसभेवर नियुक्त असा त्यांचा राजकीय प्रवास घडला आहे.एक उमदे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. काँग्रेस नेते राहूल गांधी ब्रिगेडचे ते एक प्रभावी नेते होते.
संसदेतील मित्र गमावला
संसदेतील माझे मित्र राजीव सातव जी यांच्या निधनाने मी दु:खी आहे. ते अधिक क्षमता असलेले भविष्यातील आगामी नेते होते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांबद्दल मला दु:ख आहे. ओम शांती.
नरेंद्र मोदी,पंतप्रधान
उमलते नेतृत्व हरपले
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे.
शरद पवार,राष्ट्रवादीचे अध्यक्ष