महाराष्ट्र स्टील कंपनीचा नवा आदर्श; 18 शाळांचा होणार कायापालट
| माणगाव | प्रतिनिधी |
केवळ औद्योगिक प्रगती म्हणजे विकास नव्हे, तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचवणे हीच खरी प्रगती. हा विचार प्रत्यक्षात उतरवत पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने माणगाव तालुक्यात सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे. कंपनीच्या उपक्रमांतर्गत माणगाव तालुक्यातील रा.जि.प. शाळा उतेखोल आदिवासीवाडी आणि रा.जि.प. शाळा चव्हाणवाडी मिळून 16 जिल्हा परिषद शाळांचे नूतनीकरण व 2 शाळांचे संपूर्ण बांधकाम (एकूण 18 शाळा) आणि सुविधांचे उन्नतीकरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना आता सुरक्षित, स्वच्छ आणि प्रेरणादायी वातावरणात शिक्षण घेता येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या दोन शाळांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (दि.12) पार पडला. यावेळी पोस्को महाराष्ट्र स्टीलचे संचालक वॉन क्यू हान यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची खरी गुरुकिल्ली आहे. मुलांसाठी एक सुरक्षित आणि उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. हा प्रकल्प केवळ आमचा नसून ग्रामस्थ, शाळा प्रशासन आणि आमच्या टीमच्या एकत्रित परिश्रमाचे फळ आहे. पोस्को महाराष्ट्र स्टील केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता, माणगांव तालुक्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असल्याचेही हान यांनी स्पष्ट केले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि उपजीविका या चार प्रमुख स्तंभांवर कंपनी आपले सामाजिक कार्य यापुढेही असेच सुरू ठेवणार आहे. विद्यार्थ्यांनी या सोयी-सुविधांचा पूर्ण लाभ घ्यावा, मोठी स्वप्ने पाहावीत आणि जिद्दीने अभ्यास करावा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये केवळ डागडुजी न करता विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहांची दुरुस्ती, शाळेच्या आवारात सुरक्षिततेसाठी मजबूत गेट्स आणि खिडक्यांना ग्रील्स बसवण्यात आले आहेत. संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करून शैक्षणिक वातावरण प्रसन्न करण्यात आले आहे. या सोहळ्याला वरिष्ठ अधिकारी राजू गडुते आणि सी. एस. आर. टीम, तसेच शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, हा बदल म्हणजे केवळ नवीन रंगरंगोटी नसून आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची भक्कम पायाभरणी आहे.







