| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावात अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या नोंदणीकृत मंडळाची दक्षिण रायगड जिल्ह्याची सहविचार सभा शनिवार, दि.14 जून रोजी कुणबी भवन माणगाव याठिकाणी भजनसम्राट तथा मंडळाचे अध्यक्ष भगवान लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव प्रमोद हर्यान, उपाध्यक्ष सुनील दबके, कार्याध्यक्ष राजा दळवी, आयोजक उदय शिंदे, मंडळाचे सभासद, भजनी कलाकार यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.
या सहविचार सभेत आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात मंडळाची माहिती देताना मंडळाचे सचिव प्रमोद हर्यान यांनी सांगितले की, भजनी कलाकारांनी संघटित होऊन संघटना मजबूत करणे ही काळाची गरज आहे. आपली ही संघटना नजीकच्याच काळात निश्चितच मजबूत होणार आहे. मंडळातर्फे भजनी कलाकारांची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून, वेगवेगळे उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात येत आहेत. यासाठी भजनी कलाकारांनी वार्षिक किंवा आजीव सभासद होणे आवश्यक आहे. आपल्या कलाकारांना शासनाकडून मानधन व पेन्शन मिळाली पाहिजे. तळागाळातील भजनी कलाकारांना पुरस्कार मिळाले पाहिजेत. आपला न्याय्य हक्क हा आपल्या सर्व कलाकारांना मिळाला पाहिजे. आपल्या मंडळाचे जे आजीव सभासद आहेत त्यांना आपण एक ते दोन लाख रुपयांचा विमा कवच देत असतो. संघटनेचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संघटित झाले तर आपल्या मंडळाच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न निश्चितच मार्गी लागतील, असे सांगत सभेला उपस्थित सर्व मान्यवर व भजनी कलाकारांचे आभार मानले.
या सहविचार सभेला अजित देशमुख, राजू दळवी, विद्याधर चोरगे, राजाभाऊ सोलम, संतोष शीतकर, विजय पायकोली आदींसह माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा, सुधागड तालुक्यांतील भजनी कलाकार उपस्थित होते.